कोल्हापूर: कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुराने शेतीसह छोटे मोठे उद्योग-व्यवसाय अशा विविध घटकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. या महापुराच्या विळख्यातून लवकर सावरण्याची गरज आहे. महापुरामुळे फटका बसलेल्या नागरीकांचा आक्रोश सुरू आहे. हा आक्रोश शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आज शेकडो शेतकऱ्यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
ऑगस्ट महिन्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे महापूर येऊन कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेकडो गावांना पुराचा वेढा पडला. एक हजार पेक्षा अधिक घरे या पुरामुळे धोकादायक बनली आहेत. यंत्रमाग कारखाने बाधित झाले आहेत. या पुरामुळे चार लाख लोकांचे स्थलांतर झाले आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी आणि उद्योजकांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या पूरग्रस्तांना मिळालेली रक्कम ही तुटपुंजी आहे.
कोल्हापुरातही पुरग्रस्तांना भरीव नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढला. यामध्ये शेतकरी, व्यापारी, उद्योजक, व्यवसायिकांसह पूरग्रस्त असलेले सामान्य नागरिक सहभागी झाले होते. या मोर्चाचे नेतृत्त्व माजी खासदार राजू शेट्टी आणि कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केले.