मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आणि आमदार नितेश राणे अखेर 18 दिवसांनी अज्ञातवासातून बाहेर आले आहेत. आज कोर्टाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिल्याने त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेतील नूतन अध्यक्षांची भेट घेत अभिनंदन केले. 18 दिवसांनंतर पहिल्यांदाच ते आज माध्यमांसमोर आले. यावेळी त्यांना भेटण्यासाठी समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून ते अज्ञातवासात होते. ते नेमके कुठे आहेत याची कोणालाही माहिती नव्हती.
दरम्यान, आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीनावरील मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालय सोमवारी निर्णय जाहीर करणार आहे. हा निकाल येईपर्यंत नितेश राणेंना अटकेपासून दिलेला दिलासा कायम ठेवण्यात आला आहे.
संतोष परब यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी हा खटला सुरु आहे. पण विधानसभेचे अधिवेशन सुरु असताना म्यॉव म्यॉव प्रकरण राज्य सरकारला झोंबल्याने आपल्यावर सूडबुद्धीने कारवाई करण्यात येत असल्याचा दावा नितेश राणेंच्या वतीने करण्यात आला. त्यावर संतोष परब हल्ला प्रकरण हे त्या आधीचं असून या दोन घटनांचा कोणताही संदर्भ लागत नसल्याचे राज्य सरकारच्या वतीने न्यायालयात स्पष्ट करण्यात आले आहे. आता या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून त्यावर न्यायालय सोमवारी आपला निकाल देणार आहे. पण तोपर्यंत आमदार नितेश राणेंना अटकेपासून दिलेला दिलासा कायम ठेवण्यात आला आहे.