उस्मानाबाद – गेल्या दोन महिन्यांपासून विलिनीकरणाच्या मुद्यावरून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. राज्य सरकारकडून आंदोलन मागे घेण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले मात्र सर्व प्रयत्न फसल्याचे चित्र आहे. एसटी कर्मचारी अजूनही त्यांच्या मागणीवर ठाम असून संप सुरुच आहे. दरम्यान, उस्मानाबाद येथील एका एसटी कर्मचाऱ्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी बांगड्या विकण्याचा हंगामी व्यवसाय सुरु केला आहे. बांगड्या विकू मात्र आंदोलन सुरुच राहणार असे एसटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
एसटी वाहक संतोष राऊत यांनी हा व्यवसाय सुरु केला आहे. राऊत म्हणातात, कुटुंबात एकूण सात व्यक्ती आहेत. त्यात तीन मुलांचे शिक्षण त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून बांगडी विकण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 26 वर्षांपासून मी एसटी महामंडळात वाहक पदावर आहे. मात्र, एवढ्या दिवसांत अजूनही मी स्वत:चे घर घेऊ शकलो नाही. मग ही नोकरी कशासाठी करायची असा सवालही त्यांनी उपस्थित केला. बांगड्या विकून प्रपंच भागवू मात्र आंदोलन मागे घेणार नसल्याचे राऊत यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, राज्य सरकारकडून एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना संप मागे घ्या, कामावर या अशी विनंती केली जात आहे. या दरम्यान अनेक कर्मचाऱ्यांना निलंबित तर काहींना बडतर्फही करण्यात आले आहे. मात्र एसटी आंदोलक आपल्या विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 238 कर्मचाऱ्यांचे निलंबन तर 51 जणांना बडतर्फ करण्यात आले आहे. संतोष राऊत यांच्याप्रमाणे इतर आंदोलक कर्मचाऱ्यांनी उपजिविकेसाठी पर्यायी मार्ग शोधला आहे. बाजारात भाजी विक्रीपासून ते खाजगी वाहनावर रोजंदारी चालक म्हणून काम करायला सुरुवात केली आहे.