नवी दिल्ली – गेले अनेक दिवस काश्मिरात हिंदुंच्या सर्रास हत्या होत आहेत. तेथे काश्मिरी पंडितांचे आताही पलायन सुरू झाले आहे. त्यांची तेथे निदर्शने सुरू आहेत. त्यामुळे अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले असतानाच भाजपचे राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी या प्रकरणी थेट अमित शहा यांच्याच राजीनाम्याची मागणी केली आहे.
त्यांना गृहमंत्रालयाचा कारभार झेपत नाही आणि काश्मिरातील हिंदुंच्या हत्या थांबत नाहीत त्यामुळे त्यांना गृहमंत्रिपदाऐवजी क्रीडा मंत्रालयाचा कारभार द्या अशी सूचना त्यांनी केली आहे.
या संबंधात जारी केल्या एका ट्विटर संदेशात त्यांनी म्हटले आहे की, जम्मू काश्मिरात सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे. आणि तरीही तेथे रोज हिंदुंच्या हत्या होत आहेत. त्यामुळे अमित शहा यांचा राजीनामा मागणे अत्यंत आवश्यक बनले आहे. सध्या त्यांना क्रिकेटमध्ये बराच रस निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांना गृहमंत्रिपदाऐवजी क्रीडा मंत्रिपद द्या, अशी मागणीही त्यांनी केली आहे.