नगर, (प्रतिनिधी) – जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या वातावरणाचा ज्वर वाढत असतांना दुसरीकडे पाणी टंचाईचे भीषण चित्र आहे. उन्हाच्या वाढत्या कलाहीमुळे नगरकर हैराण झाले असतांना पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना वणवण भंटकती करावी लागत आहे.
यामुळे जिल्ह्यात २६८ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असून ५ लाख २२ हजार नागरिकांची तहान या टँकरद्वारे भागविण्यात येत आहे. जिल्ह्यात २५५ गावे व १ हजार ३९५ वाड्या वस्त्यांवर टंचाईच्या झळा जाणवत असून सर्वाधिक टंचाईच्या झळा पाथर्डी, कर्जत, पारनेर, संगमनेर या तालुक्यात जाणवत आहेत.
गेल्या २० ते २५ दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढल्याने ग्रामीण भागात पाण्याचे उद्भव अचानकच कोरडे पडून लागल्याने दररोज पाण्याच्या टँकरच्या मागणी वाढत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनासह जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाला प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागत आहे.
एकीकडे लोकसभा निवडणुकीचे वातवरण आणि दुसरीकडे भीषण दुष्काळ या दोन्ही पातळीवर प्रशासनाची काम करतांना चांगलीच दमछाक होत आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षी सरसरीपेक्षाही कमी पाऊस झाल्याने जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात टँकरच्या मागणीला सुरुवात झाली. अर्थात टँकरची निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यास फेब्रुवारी महिना उजाडला. त्यानंतर खर्याअर्थाने टँकरमध्ये वाढ होऊ लागली. दोन महिन्यात २६८ टँकरद्वारे पाणीपुरवठा आज अखेर केला जात आहे.
सर्वांधिक पाणी टंचाईची तीव्रता ही पाथर्डी तालुक्यात असून निम्म्याहून अधिक तालुक्याला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या या तालुक्यात ८० गावे ४०४ वाड्यांना ८९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. याठिकाणी तब्बल १ लाख ६२ हजार ७४६ लोकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असून तालुक्यातील निम्म्याहून अधिक लोकांची टँकरने तहान भागविण्यात येत आहे. जिल्ह्यात राहाता, राहुरी, कोपरगाव, श्रीरामपूर हे चार तालुके वगळता उर्वरित १० तालुक्यामध्ये टँकर सुरू झाले आहेत.
तालुकानिहाय गाव, वाड्या, टँकर व लोकसंख्या पुढीलप्रमाणे आहे. संगमनेर ३१ गावे १०१ वाड्या २५ टँकर (लोकसंख्या ४५ हजार ४७१), अकोले 2 गावे २० वाड्या ५ टँकर (लोकसंख्या ७ हजार १८८), नेवासा २ गावे २ टँकर (लोकसंख्या २ हजार ५६५), नगर १९ गावे ७० वाड्या १८ टँकर (लोकसंख्या २७ हजार ६४९), पारनेर ३७ गावे २९८ वाड्या ३२ टँकर (लोकसंख्या ७८ हजार २१९),
पाथर्डी ८० गावे ४०४ वाड्या ८९ टँकर (लोकसंख्या १ लाख ६२ हजार ७४६, शेवगाव ११ गावे ६२ वाड्या १० टँकर (लोकसंख्या १३ हजार ६४), कर्जत ३८ गावे २२३ वाड्या ३४ टँकर (लोकसंख्या ७३ हजार २८५), जामखेड २२ गावे ६० वाड्या २० टँकर (लोकसंख्या ४६ हजार ३६५), श्रीगोंदा ६ गावे ६० वाड्या ९ टँकर (लोकसंख्या १५ हजार १७७).
१०९ विहीर व कुपनलिका अधिग्रहण
पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागल्याने प्रशासने गावसह टँकर भरण्यासाठी तब्बल १०९ विहिर व बोर अधिग्रहण केल्या आहेत. गावासाठी ६६ तर टँकर भरण्यासाठी ४३ विहिरी व बोर अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात मंजूर टँकर आणि होणार्या खेपा यांच्या टक्केवारी ८७.९६ टक्के खेपा पूर्ण होत आहे.