पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे काही नगरसेवक आणि आमदार प्रचारात सक्रीय नसल्याचे समोर आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पुण्यात पुणे, बारामती तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघातील आमदार तसेच सर्व माजी नगरसेवकांचा वर्ग घेतला.
यावेळी प्रत्येकाने मतदारांपर्यंत पोहचा अन्यथा महापालिकेचे तिकिट विसरा, पक्षाकडे अनेक जण तिकिटासाठी तयार आहेत, असे सांगत नगरसेवकांना चांगलाच दम भरला. तसेच ही बाब आमदारांसाठीही लागू असेल असेही ते म्हणाले. कोरेगाव पार्क परिसरात नगरसेवकांची ही तातडीची बैठक घेण्यात आली. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, लोकसभा समन्वयक श्रीनाथ भिमाले यावेळी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून पुण्यात मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली असून काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यामुळे भाजपकडून कसब्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्व पातळ्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. स्वत: फडणवीस पुण्यावर लक्ष ठेवून आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांत शहरातील पक्षाचे काही आमदार तसेच माजी नगरसेवक प्रभागात सक्रीय नसल्याचे समोर आले आहे.
याची गंभीर दखल घेत फडणवीस यांनी प्रत्येकाने कशा प्रकारे प्रचाराचे नियोजन करावे, सोसायटी भेटी, कोपरा सभा तसेच पक्षाच्या उमेदवाराची माहिती आठ दिवसांच्या आत घरोघरी पोहचविण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच, जे लोकसभेसाठी काम करतील त्यांचाच विचार विधानसभा तसेच महापालिका निवडणुकीसाठी केला जाईल. हे लक्षात ठेऊनच काम करावे, असा कडक सूचना माजी नगरसेवकांना केली आहे.
काम न करणाऱ्यांची माझ्यकडे यादी…
यावेळी फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीचे काम करत नसलेल्या १० ते १२ नगरसेवकांची यादीच आपल्याकडे आली असून त्यांच्याशी चंद्रकांत पाटील व्यक्तिगत स्वरूपात बोलतील, असे सांगितले. त्यानंतरही संबंधित नगरसेवक पक्षाच्या प्रचारात दिसले नाहीत तर पक्ष त्यांची योग्य दखल घेइल, असा गर्भित इशाराही फडणवीस यांनी यावेळी दिला आहे.