कोपरगाव – मागील 70 वर्षात कॉंग्रेसने राबविलेल्या विविध योजनांमुळे देश समृद्ध झाला. मात्र सात वर्षापूर्वी सत्तेवरआलेल्या भाजप हा सातत्याने खोटे बोलून देशवासियांची दिशाभूल करीत आहेत. जातीधर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांपासून देशाला वाचविण्यासाठी कॉंग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने अधिक जोमाने काम करावे, असे आवाहन महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील यांनी केले. तर कॉंग्रेस पक्ष पुन्हा जोरदार कमबॅक करेल असा विश्वास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
शिर्डी- कोपरगाव रस्त्यावरील साई सृष्टी लॉन्स येथे उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा व डिजिटल आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीयमंत्री पल्लम राजू, कॉंग्रेसचे सचिव बी. एम. संदीप, कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, आमदार हिरामण खोसकर, आमदार शिरीष चौधरी, माजीमंत्री पद्माकर वळवी, डॉ.शोभाताई बच्छाव, उल्हास पाटील, शरद आहेर, हेमलता पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, नाशिकचे डॉ. तुषार शेवाळे, धुळे जिल्हाध्यक्ष शाम सनेर, जळगाव जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कीर्ती वळवी, अनुराधा नागवडे आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, पंतप्रधान हे खोटे बोलून जनतेची दिशाभूल करीत आहेत. कोणतेही काम न करता फक्त जाहिरातबाजी करणाऱ्या या लोकांनी नोकऱ्याची खोटी आश्वासने दिली. मंत्री थोरात म्हणाले, जाती धर्माच्या नावावर मते मागून सत्तेवर आलेले भाजप सरकार हे राज्य अस्थिरता निर्माण करू पाहत आहे. कॉंग्रेस हा एक विचार असून अनेक संकटातून हा पक्ष पुढे आला आहे. श्रीमती इंदिरा गांधींच्या काळात ही पक्षाला संघर्ष करावा लागला, मात्र पुन्हा कॉंग्रेसने भरारी घेतली. आता पक्षासाठी मंदी असली तरी नव्या कार्यकर्त्यांसाठी ही मोठी संधी आहे. कॉंग्रेसचे संघटन वाढवणे गरजेचे असून गोरगरीब माणूस ही खरी कॉंग्रेसची ताकद आहे. येणाऱ्या काळामध्ये सोनिया गांधी व खा.राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस देशात जोरदार कमबॅक करणार असल्याचे ते म्हणाले
आमदार डॉ. तांबेंचा सर्वाधिक प्रवास व संपर्क
आमदार डॉ. सुधीर तांबे यांचा एका वर्षात सुमारे पाच लाख किलोमीटरचा प्रवास असून प्रत्येक तालुक्यातील जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांशी अगदी आत्मीयतेने आणि जिव्हाळ्याने त्यांनी संबंध निर्माण केले आहेत. हे देशभरातील एक आदर्शवत उदाहरण असल्याचे मंत्री थोरात यांनी म्हटले.
मंत्री थोरात यांचेदेशपातळीवर नेतृत्व
मंत्री बाळासाहेब थोरात यांचे लोकप्रिय नेतृत्व हे महाराष्ट्रापुरते राहिले नसून महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक यासह देशपातळीवर ते महत्त्वाची भूमिका निभावत आहे. पक्षबांधणी, राष्ट्रबांधणीचे काम करणारे मंत्री थोरात यासारख्या नेत्यांमुळे कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण होत असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.