शेवगाव – तालुक्यातील शहरटाकळीच्या यात्रेत अक्षय संजय आपशेटे या युवकावर गावातीलच ७ – ८ जणांच्या टोळक्याने गुरुवारी रात्री सशस्र हल्ला केला होता. यात गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान त्याच दिवशी रात्री साडेअकराला मृत्यू झाला. यासंदर्भात त्याचा भाऊ संकेत आपशेटे याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी एका आरोपीस तात्काळ अटक केली असली तरी ग्रामस्थांचे मात्र यावर समाधान झाले नाही. ग्रामस्थांनी यासंदर्भात सर्व आरोपींना अटक करावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी सोमवारी भातकुडगाव फाट्यावर रास्ता रोको करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, शहरटाकळी गावबंदचे आवाहन देखील करण्यात आल्याने आज दुसऱ्या दिवशीही गाव बंद होते.
यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. गुन्हयातील फरार आरोपींना त्वरित जेरबंद करून त्यांचेवर सक्त कारवाई करावी. तसेच गुन्ह्यामागील सूत्रधाराचा शोध घेऊन त्याचेवरही कारवाई व्हावी. पंचनाम्यापूर्वी घटना स्थळावरील रक्त धुण्यात आले. ते कोणी धुतले ? त्यामागील उद्देशाची तपासणी व्हावी. शहरटाकळी येथील गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेले दूरक्षेत्र पुन्हा सुरु करून तेथे दोन पोलीस कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात यावी तसेच शहर टाकळी परिसरातील सर्व अवैध धंदे त्वरित बंद करण्यात यावेत, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.