भोपाळ – इंधन दरवाढ, महागाईच्या भडक्याने सामान्य जनता होरपळली आहे. मात्र, मध्य प्रदेशचे मंत्री आणि भाजप नेते ओमप्रकाश सकलेचा यांनी महागाईवरून तत्त्वज्ञान शिकवले आहे. जीवनात समस्यांमुळेच सुखाचा आनंद मिळतो, असे त्यांचे म्हणणे आहे.
मंत्रिमहोदय सकलेचा यांनी शनिवारी छतरपूरचा दौरा केला. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना महागाईबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी तत्त्ववेत्त्याच्या भूमिकेत शिरलेल्या सकलेचा यांनी अजब-गजब प्रतिक्रिया दिली.
जीवनात एकही समस्या नसेल; तर सुखाचा आनंदही मिळत नाही, असे त्यांनी म्हटले. महागाई हे केंद्रातील मोदी सरकारचे अपयश आहे का, असे विचारणाऱ्या पत्रकारांना त्यांनी फटकारले. आपल्यासारख्या अफवा पसरवणाऱ्या लोकांचे तसे मत असू शकते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रत्येक धोरण चांगले आहे. कॉंग्रेसला पोलिओ लस देण्यास 40 वर्षे लागली. त्याउलट, मोदींच्या नेतृत्वात वर्षभरात करोनावरील लस तयारही झाली आणि लवकरच लसीकरणही पूर्ण होईल, असे सकलेचा म्हणाले.
याआधीही भाजपच्या काही नेत्यांनी महागाई आणि इंधन दरवाढीवर उतारा म्हणून विचित्र उपाय सुचवले. एका नेत्याने तर सायकल चालवण्याचे फायदे नमूद केले.