मुंबई – श्रीकांत शिंदे हे ऑथॉरिटी नाहीत. दिल्लीचे नेतृत्वच उमेदवारांची नावे ठरवणार असे विधान भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केले आहे. नाशिक दौऱ्यावर असताना शिवसेनेचे कल्याण लोकसभा मतदारसंघातील खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये आपल्या पक्षाच्या एका उमेदवाराची घोषणा करून टाकली आहे.
नाशिक दौऱ्यावर गेलेल्या श्रीकांत शिंदे यांनी पुन्हा एकदा हेमंत गोडसे हेच महायुतीचे उमेदवार असतील, असे स्पष्ट केले आहे. यावर प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी दरेकर यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ”बैल गेला आणि झोपा केला…जेव्हा उद्धव ठाकरेंनी फिरायला पाहिजे होते, तेव्हा ते घरात बसले. अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना मातोश्री मधून बाहेर पडले नाहीत.
जेव्हा शिवसैनिकांशी संवाद साधायला पाहिजे होता तेव्हा साधला नाही. अख्खी शिवसेना एकनाथ शिंदेंच्या सोबत गेली, तेव्हा त्यांना जाग येते. मात्र आता जाग येऊन त्यांच्या हाताला काहीच लागणार नाही”, असे म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे.
दरम्यान भाजप मुंबईत पाच जागांवर लढू शकते अशी चर्चा आहे. यावर प्रतिक्रिया देताना दरेकर म्हणाले, ”आमचा मोठा पक्ष आहे. 48 लोकसभा मतदारसंघात आमचे कार्यकर्ते काम करतात. जशी त्यांना उमेदवारी पाहिजे असते, तशी आमच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी दिली पाहिजे असे वाटते. मात्र दिल्लीचे नेतृत्व याबाबत निर्णय घेईल”.
बच्चू कडूंनी चार भिंतीत बोलावे
दरेकरांनी आमदार बच्चू कडू यांच्या विधानाचाही चांगलाच समाचार घेतला आहे. ”पंतप्रधान पण आम्हीच बनवला असे विधान बच्चू कडूंनी केले नाही हे नशीब. महायुतीमध्ये विसंवाद होईल अशा प्रकारचे वक्तव्य बच्चू कडू यांनी करू नये. असे वक्तव्य करणे बच्चू कडू यांच्या हिताचे नाही. त्यांना काही बोलायचे असेल, तर त्यांनी चार भिंतीच्या आत बोलावे”, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.