नागपूर: राज्यपालांच्या अभिभाषणात एकही अवास्तविक मुद्दा नसल्याचे सांगत आ. प्रकाश गजभिये यांनी विधान परिषदेच्या सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणावर भाष्य केले.
शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टींना प्राधान्य देत महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मागील सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. प्रत्यक्षात कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांचे नुकसान केले आणि आता महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार स्थापन होऊन काही दिवसही झाले नसताना विरोधक कर्जमाफीची ओरड करत आहेत. त्यामुळे मागची पाच वर्षे तुम्ही काय केलं, असा प्रश्न उपस्थित करुन आ. प्रकाश गजभिये यांनी विरोधकांच्या आरोपांचे खंडन केले.
डिजिटल सरकार आणि गरीब शेतकरी अशी तफावत फडणवीस सरकारने निर्माण केली होती. नागरिकांना बँकांमधून पैसे काढता येत नाहीत अशी परिस्थिती मागील सरकारने निर्माण केली. राज्याची आर्थिक घडी नीट असताना हजारो कोटींचा कर्जाचा डोंगर उभा केला, असे मुद्दे सभागृहात उपस्थित करुन आ. प्रकाश गजभिये यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
फडणवीस सरकारने केवळ नाव बदलून जुन्या योजना पुढे आणल्या. त्याने शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही. मागील सरकारने एकही असा प्रकल्प आणला नाही ज्यामुळे बळीराजाला दिलासा मिळेल. शिवाय पर्यावरणासाठी ५० कोटी झाडे लावण्याची घोषणा केली होती ती झाडे कुठे गेली याचा पत्ता नाही. त्यामुळे या सर्व मुद्द्यांवर गांभीर्याने विचार करून महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार राज्यातील परिस्थिती सुधारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास आ. प्रकाश गजभिये यांनी व्यक्त केला.