अहमदाबाद – गुजरातच्या राजकीय रणांगणात ताकदीने उतरण्याची तयारी करणाऱ्या आम आदमी पक्षाला (आप) सोमवारी मोठा हादरा बसला. त्या पक्षाबरोबरची अल्पकालीन युती तोडण्याची घोषणा भारतीय ट्राइबल पक्षाने (बीटीपी) केली. गुजरातमध्ये चालू वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी आपने कंबर कसली आहे.
त्यातून आपने चालू वर्षी मेमध्ये आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बीटीपीशी युती केली. मात्र, बीटीपीने अवघ्या चार महिन्यांतच ती युती तोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची माहिती बीटीपीचे प्रमुख छोटूभाई वसावा यांनी दिली. त्या निर्णयामागील भूमिका उघड करताना त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.
गुजरातमध्ये सत्तारूढ भाजपला थेट विजय मिळणार नसल्याची जाणीव त्या पक्षाला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना झाली आहे. त्यामुळे बीटीपीचा पराभव करण्याची जबाबदारी भाजपने केजरीवाल यांच्यावर सोपवली आहे. युती करतानाच केजरीवाल यांनी आपमध्ये बीटीपी विलीन करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, तो फेटाळून आम्ही स्वतंत्र पक्ष म्हणून यापुढेही कार्यरत राहणार असल्याचे स्पष्ट केले होते, असा गौप्यस्फोटही वसावा यांनी केला. गुजरातमध्ये सध्या बीटीपीचे 2 आमदार आहेत.