मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना केंद्राकडून चांगली बातमी देण्यात आलीआहे. राज्यातील शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी केंद्राने मुदतवाढ दिली आहे. आज पीक विम्यासाठी हफ्ता भरण्याची शेवटची तारीख होती. पण केंद्र सरकारकडून बळीराजाला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता शेतकऱ्याला 3 ऑगस्टपर्यंत पिक विमा हफ्ता भरता येणार आहे. दरम्यान, पिक विम्यासंदर्भातील राज्य सरकारच्या विनंतीला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. ऑनलाईन फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेत निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.
सरकारच्या या योजनेतून केवळ एक रुपयांमध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेतातील उभ्या पिकाचा विमा उतरवता येतो. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पार पडते. पण गेल्या अनेक दिवसांपासून पिक विमा उतरवताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. गेल्या काही दिवसांपासून पिक विमा भरण्यासाठी सरकारची वेबसाईट योग्यप्रकारे चालत नसल्याने शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक जिल्ह्यातील शेतकरी सीएससी सेंटरवर पिक विमा अर्ज भरण्यासाठी चकरा मारत होते, पण ऑनलाईन फॉर्म भरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. तर काही जणांनी तर सीएससी सेंटरवरच थांबणं पसंत केले होते.
यावर्षी पहिल्यांदाच एक रुपयात पिक विमा भरून घेत जात असल्याने सर्वच शेतकरी पिक विमा भरण्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यामुळे, सर्वच सीएससी सेंटरवर शेतकरी पिक विमा भरण्यासाठी गर्दी करत असले तरी, दुसरीकडे मात्र पीक विमा भरण्यासाठीची वेबसाईट सतत हँग होत असल्याने शेतकऱ्यांना दिवस-दिवस सीएससी सेंटरवर बसून राहावं लागत होतं. अशातच पिक विमा भरण्यासाठी देण्यात आलेली शेवटची तारीख जवळ येत चालली होती.
याच पार्श्वभूमीवर अनेक शेतकऱ्यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणात विशेष लक्ष देऊन पिक विमा भरण्यासाठी वेबसाईट सुरळीत करून पीक विमा भरण्यासाठी मुदत वाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. बळीराजाच्या याच मागणीचा विचार करुन राज्य सरकारने तशी विनंती केंद्र सरकारकडे केली होती. राज्याची हीच विनंती मान्य करत आता पिक विमा भरण्यासाठी केंद्राकडून 3 ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.
जून महिन्यात हुलकावणी देणाऱ्या पावसाने अखेर जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सर्व दूर दमदार हजेरी लावली खरी मात्र, अद्याप राज्यातील बहुतांश भागातील पाण्याचा साठा वाढलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये हवामानाचा फटका शेतीला बसलाच तर, पिक विमा एकमेव आधार शेतकऱ्यांना असतो आणि त्यामुळेच विना अडथळा तो पिक विमा शेतकऱ्यांना मिळावा हीच अपेक्षा.