नवी दिल्ली : देशात सध्या केंद्राच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येताना दिसत आहेत. या सर्व घडामोडीत माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी दिल्लीमधील आपल्या घरी विरोधकांसाठी डिनरचे आयोजन केले होते. कपिल सिब्बल यांनी वाढदिवसानिमित्त हे डिनरचे आयोजन केले असले तरी यावेळी चर्चा मात्र मोदी सरकारविरोधात सुरु होती. विशेष म्हणजे यावेळी काँग्रेसमधील बदलांसंबंधीही प्रश्न उपस्थित करण्यात आले.
गांधी कुटुंबाने नेतृत्व सोडले तरच पक्ष मजबूत करणे शक्य असल्याचेही मत यावेळी काहीजणांनी व्यक्त केल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. यावेळी गांधी कुटुंब उपस्थित नव्हते. २०१४ मध्ये पराभव झाल्यानंतर पक्षाची घसरण होऊ लागल्याने चिंता व्यक्त करत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्यांमध्ये कपिल सिब्बल यांचाही समावेश होता.
Delhi: NCP chief Sharad Pawar, TMC MP Derek O’Brien, RJD chief Lalu Prasad, DMK’s Tiruchi Siva, RLD leader Jayant Chaudhary, Samajwadi Party chief Akhilesh Yadav, Congress MPs Shashi Tharoor & Anand Sharma & other Opposition leaders arrive at Kapil Sibal’s residence for a meeting pic.twitter.com/RgHsMXDBmj
— ANI (@ANI) August 9, 2021
काँग्रेस नेत्यांच्या या धाडसी पत्रामुळे त्यावेळी खळबळ माजली होती. या पत्रात काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलांची मागणी करत नेतृत्वासंबंधीही मत व्यक्त करण्यात आलं होतं. आमंत्रितांमध्ये पी चिदंबरम, शशी थरुर आणि आनंद शर्मा यांचाही समावेश होता. या तिघांनाही पक्षाच्या भवितव्यासंबंधी चिंता व्यक्त केली आहे.
डिनर पार्टीत सहभागी झालेल्या नेत्यांमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रियन, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला उपस्थित होते.
यावेळी कपिल सिब्बल यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला करत कशाप्रकारे त्यांच्या काळात प्रत्येत संस्था नष्ट केली जात आहे याचा उल्लेख केला. एक दृष्टीकोन समोर ठेवून विरोधकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचेही यावेळी ते म्हणाले. ओमर अब्दुल्ला यांनी यावेळी जेव्हा काँग्रेस मजबूत असते तेव्हा विरोधकही मजबूत असतात असतात सांगत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी काय केले जात आहे अशी विचारणा केली.
अकाली दलचे नरेश गुजराल यांनी तर थेट गांधींवरच हल्लाबोल केला. जोपर्यंत गांधी कुटंबाकडे नेतृत्व आहे तोपर्यंत पक्ष मजबूत करणं कठीण असल्याचे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. सत्ताधारी आणि विरोधकांनी अनेकदा काँग्रेसने नेतृत्वात बदल करण्यासंबंधी भाष्य केले आहे. दरम्यान काँग्रेसमधील काही नेते राहुल गांधी यांनी पुन्हा अध्यक्षपद हाती घ्यावे अशी इच्छा व्यक्त करत आहेत.