भोपाळ :- सुरूवातीपासूनच सतत होत असलेल्या विविध दुर्घटनांमुळे “वंदे भारत’ एक्सप्रेस वादात राहिली आहे. त्यातच भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या एका कोचला भीषण आग लागल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या ट्रेनला नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला होता.
प्राथमिक माहितीनुसार बॅटरीमधून ही आग लागल्याची माहिती प्रवाशांनी दिली. ही ट्रेन सकाळी 5.30 वाजता हजरत निजामुद्दीन येथून भोपाळहून निघाली होती. या डब्यात साधारण 26 प्रवासी होते, अशी माहिती मिळाली आहे.
या ट्रेनला आग लागल्याची माहिती मिळताच वीणा स्थानकात तातडीने ट्रेन थांबवण्यात आली. तसेच सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे. सीटच्या खालून ही आग आली असा दावा काही प्रवाशांनी केला आहे.
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये पहिल्यांदाच अशी घटना समोर आली आहे. या दुर्घटनेवर अद्याप रेल्वे प्रशासन किंवा अधिकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.