इस्लामाबाद :- पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील गुन्हेगारी टोळ्यांनी 30 हिंदूंना ओलीस ठेवले आहे, असा दावा पाकिस्तानमधील मानवी हक्क आयोगाने केला आहे.
ओलीस ठेवलेल्यांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे, असे आयोगाने म्हटले आहे. सिंध प्रांतातील घोटकी आणि काश्मोरे या जिल्ह्यांमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या ढासळलेल्या स्थितीबाबतही आयोगाने चिंता व्यक्त केली आहे. या जिल्ह्यांमध्ये गुन्हेगारी टोळ्यांकडून अल्पसंख्यांच्या धार्मिक ठिकाणांवर हल्ल्यांच्या धमक्या देखील देण्यात आल्या आहेत. या धमक्या देताना या गुन्हेगारी टोळ्यांनी अल्पसंख्य समुदायाला अत्याधुनिक शस्त्रांचा धाक दाखवल्याचेही आयोगाने म्हटले आहे.
सिंध प्रांताच्या गृह विभागाने त्वरित या जिल्ह्यांमधील कायदा आणि सुव्यवस्थेची पहाणी करावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या उपाय योजना कराव्यात, असे मानवी हक्क आयोगाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
सिंध प्रांतातील तांदो अलाहयार जिल्हा आणि शेख भिरकीओ गावातही अल्पसंख्यांच्या धार्मिक स्थळांवरही हल्ले झाल्याचे आयोगाने म्हटले आहे.
सिंध मधील काश्मोरे जिल्ह्यातील एका मंदिरावर दरोडेखोरांनी रॉकेट हल्ला केल्याचेही उघड झाले आहे. तर कराचीमधील 150 वर्षे जुने मंदिर रातोरात पाडून टाकण्यात आले आहे.