राजगुरूनगर (प्रतिनिधी) – महाराष्ट्राची अस्मिता अखंड भाविकांचे श्रद्धास्थान ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र भीमाशंकर जर कोणी चोरून नेणार असेल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा स्पष्ट इशारा खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांना दिला आहे. तसेच आसामचे मुख्यमंत्री व तिथल्या काही मंत्र्यांनी अशा प्रकारचे अक्कल पाजळण्याचे काम केले असल्याचेही नमूद केले.
आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांच्या आसामच्या सरकारने तेथील वर्तमानपत्रात “डाकिण्या भीमाशंकर’ हे सहावे ज्योतिर्लिंग आसाम राज्यात असल्याबाबतची जाहिरातबाजी केली आहे. याबाबत मंगळवारी (दि. 14) खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले की, बारा ज्योत्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग डाकिण्या भीमाशंकर हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे. हजारो वर्षांपासून खेड तालुक्यात ज्योतिर्लिंग भीमाशंकरचे दाखले आहेत. अनेक ग्रंथात याचा उल्लेख आहे. महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचे श्रद्धास्थान बारा ज्योतिर्लिंगापैकी भीमाशंकर हे आसाममध्ये असल्याचे आसामच्या मुख्यमंत्र्यांनी जावई शोध लावला त्या ठिकाणी पर्यटन स्थळ घोषित करून येत्या महाशिवरात्रीला येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्या राज्यातील मुख्यमंत्री शर्मा यांनी कोणत्या आधारावर संशोधन करून हा शोध लावला ते मला माहित नाही, असे त्यांनी नमूद केले.
जनतेचा अंत पाहू नका
महाराष्ट्राच्या जनतेचा अंत पाहू नका, जनतेने खूप सोसले आहे. महागाई, बेरोजगारी आणि आता पुन्हा ज्योतिर्लिंग भीमाशंकर वाद हा महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालणार आहे. यासंदर्भामध्ये मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांनी तातडीने निवेदन द्यावे आणि भीमाशंकर हे महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्रातच राहील अशा प्रकारचं त्यांनी जनतेला आश्वासित करावे एवढेच आमची मागणी आहे आणि तसे केले नाही तर तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभारून विधानसभेमध्ये आवाज उठवू. महाराष्ट्राच्या जनतेला जागृत करण्याचे काम आम्ही या निमित्ताने करू मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री याबाबतीत लक्ष घालावे, अन्यथा याचे परिणाम आपल्याला उद्याच्या निवडणुकीत पाहायला मिळतील, असा स्पष्ट इशारा आमदार मोहिते पाटील यांनी दिला आहे.
“सुमारे 1300 वर्षांपूर्वी भीमाशंकर हे हेमांड पंथी मंदिर बांधले आहे. ज्योतिर्लिंग भीमाशंकर हे प्रत्येक भाविकांसाठी हे श्रद्धास्थान आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या शिवलिंगाचा उल्लेख केला ती भीमा नदी आसाम राज्यात नाही तर पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळीच हस्तक्षेप करावा. भाविकांच्या भावना भडकवू नयेत. ज्योतिर्लिंग भीमाशंकर हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे हे सत्य त्यांच्यापर्यंत पोहचवावे.
– अमोल कोल्हे, खासदार, शिरूर लोकसभा मतदारसंघ
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मूग गिळून गप्प का ?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या या कृतीचा निषेध करून त्यांना जाब विचारला पाहिजे; मात्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मूग गिळून गप्प का आहेत. मुख्यमंत्री याबाबत बोलायला तयार नाहीत.
Maharashtra politics : सत्यजीत तांबे लवकरच भाजपात प्रवेश करणार?
आसामच्या या कृत्याबाबद्दल मुख्यमंत्र्यांनी विरोध करावा आसामचे मुख्यमंत्री हेमंत शर्मा हे भाजपचे आहेत. म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षाकडे याबाबत तात्काळ भूमिका मांडावी, असे आवाहन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले आहे.