चाकण, {कल्पेश भोई} -शिरुर मतदारसंघातील खेड आळंदीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा सुरवातीच्या काळात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध होता. पण आढळराव यांनी समक्ष भेट घेऊन त्यांचे मन वळविण्यात यशस्वी झाले.
याशिवाय आंबेगावचे आमदार आणि मंत्री दिलीप वळसे पाटलांचाही सुरुवातीला आढळरावांना विरोध होता. राजकारणातील शत्रूत्व कायमस्वरूपी नसतं यानुसार दोन्ही आमदारांची समजूत घालण्यात खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार व आढळराव पाटील कमालीचे यशस्वी झाले आहेत. त्यामुळे आढळरावांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तरीदेखील खेडमधील मतदार नक्की कोणाच्या बाजूने राहणार, हे निवडणुकीनंतरच समोर येणार आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली आहे. आढळराव पाटील शिरूरचे माजी खासदार असून ते शिंदेंच्या शिवसेनेत होते. पण महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची एन्ट्री झाली आणि जागा वाटपाची गणितं बदलली.
शिरुरमध्ये राष्ट्रवादीचा विद्यमान खासदार असल्यानं अजित पवारांनी ही जागा मागून घेतली. आढळरावांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, मात्र त्यांच्या नावाची अद्याप उमेदवारीची अधिकृत घोषणा झाली नाही तरी देखील आढळराव यांनी लोकसभा लढवणार असल्याचं निश्चित केल आहे.
दरम्यान अजित पवार हे दिलीप मोहिते पाटलांच्या घरी गेले होते. त्यांनी तिथे जाऊन आढळरावांच्या उमेदवारीची औपचारिक घोषणा केली. विशेष म्हणजे यावेळी मोहितेंचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. मोहितेंचा सूर यावेळी नरमाईचा दिसला. ’मला आतापर्यंत गटातटाच्या राजकारणाचा फटका बसला आहे.
आता आढळरावांच्या रुपात त्यांचा गट तयार होऊ नये, अशी माझी अपेक्षा आहे. असे मत मोहिते यांनी व्यक्त केले. तसेच भरीस भर अजित पवार यांनी देखील कार्यकर्त्यांच्या शंकांचं निरसन केले आहे. याशिवाय आता आढळराव राष्ट्रवादीत येत असल्यानं कोणतीही अडचण नाही, असं म्हणत मोहितेंनी तलवार म्यान केली.
महायुतीची आढळरावांवर मदार
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अमोल कोल्हेंनी शरद पवारांची साथ दिली. त्यामुळे अजित पवारांनी कोल्हेंच्या पराभवाचा चंग बांधला. मागच्या वेळी मीच निवडून आणलं. यंदा मीच पाडणार, असा निर्धारच अजित पवारांनी केला. पण त्यांना तुल्यबळ उमेदवार मिळत नव्हता. आढळरावांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीतूनच विरोध होता. पण तो दूर करण्यात अजित पवारांना यश आलं आहे.
राष्ट्रवादीनं मागील दोन्ही निवडणुकीत आयारामांना संधी दिली आहे. मागच्या निवडणुकीत कोल्हे धनुष्यबाण सोडून आले. अरे किती बी ताण, नाय येत धनुष्यबाण, अशी घोषणाच त्यांनी प्रचारात केली होती. आताही आढळरावांनी शिवसेनेचा धनुष्यबाण सोडून हाती घड्याळ बांधले. शिरूर लोकसभेच्या मतदार संघातील मतदारांचा कौल येत्या निवडणुकीत दिसेल. सर्वाधिक मतदार असलेला हा मतदारसंघ कोणता निर्णय घेईल ते येणारा काळ निश्चितपणे सांगेल. आता प्रतीक्षा निवडणुकीची व निकालाची.