संगमनेर (प्रतिनिधी) – कॉंग्रेसचे बंडखोर नेते सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातून विजय संपादन केला आहे. कॉंग्रेसने निलंबित केल्यानंतर ते लवकरच भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. यावर सत्यजीत तांबे यांनी आपली भूमिका मांडली. आपण अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलो आहे, त्यामुळे अपक्षच राहणार. तसेच मी अजून कॉंग्रेस पक्ष सोडला नाही, अशी भूमिका सत्यजीत तांबे यांनी मांडली होती.
पण या सर्व घडामोडीनंतर सत्यजीत तांबे लवकरच भाजपात पक्षप्रवेश करणार याबाबत चर्चा रंगू लागल्या आहे. सत्यजीत तांबे यांनी केलेल्या एका ट्वीटमध्ये पक्षप्रवेशांच्या चर्चांना उधाण आलं आहे. सत्यजीत तांबे यांचं संबंधित ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
सत्यजीत तांबे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी, घरट्याचं काय बांधता येईल केव्हाही, क्षितिजापलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी.
सत्यजीत तांबे यांच्या या ट्वीटनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. ते लवकरच भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश करतील, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी लावला आहे.