राजगुरूनगर (प्रतिनिधी) – शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी शिवाजीराव आढळराव पाटील यांना देण्याचे ठरले आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. राजगुरूनगर येथेे राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचे निवडक कार्यकर्ते व पदाधिकार्यांचा मेळावा आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी झाला,
त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. ते म्हणाले की, शिवसेनेच्या वरिष्ठांच्या संमतीने आढळरावांना पक्षात घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी झाली आहे. या जागेसाठी दिलीप वळसे पाटील, अभिनेते नाना पाटेकर, प्रदीप कंद, विलास लांडे या सगळ्यांच्या बाबतीत विचार झाला.
आढळराव पाटील यांचे ठरले आहे. कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. आपल्या विचारांचा आणि केंद्रात सत्ता असलेल्या प्रतिनिधींचा फायदा विकासकामे करायला होतो. हलक्या कानाचे कोणी राहू नये सगळ्यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी, असे अजित पवार यांनी नमूद केले. त्यांचे गैरसमज झाले दूर (फोटो दिलीप वळसे पाटील-दिलीप मोहिते पाटील)
सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आणि आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्यातील समज-गैरसमज दूर झाले आहेत. आढळराव पाटील यांच्याशी चर्चा करून आता पक्षात घेण्याचे व त्यांना उमेदवारी देण्याचे ठरले आहे.
मोहिते-आढळरावांमध्ये दिलजमाई
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मध्यस्थीने आमदार दिलीप मोहिते पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात दिलजमाई झाली आहे.