मुंबई : शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवण्याचा विडा उचलला आहे. त्यामुळेच संजय राऊत हे रोज काही ना काही वक्तव्य करत असतात, असे म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे. तसेच त्यांनी संजय राऊत यांना होळीच्या शुभेच्छा देताना काही गोष्टीसाठी सल्ला देखील दिला आहे.
शिवसेना प्रवक्ते भरत गोगावले यांनी माध्यमांशी बोलताना त्यांना सल्ला देखील दिला आहे. यावेळी त्यांनी,’आपल्या मराठीत म्हण आहे की ठेच लागली की बघून चालावं. पण यांना किती ठेचा लागल्यावर हे सुधारणार आहेत माहित नाही असेही भरत गोगावले यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवण्याचा विडा उचलेला दिसतो आहे. संजय राऊत हे दिवसेंदिवस खूपच दर्जा सोडून बोलत आहेत असेही गोगावले यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना संजय राऊत हे सातत्याने अलीबाबा आणि चाळीस चोर असंही संबोधत आहेत. त्यांच्याविषयी आज भरत गोगावले यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा संजय राऊत यांनी तोंडावर ताबा ठेवला पाहिजे असे म्हटले आहे. तसेच उद्धव ठाकरेंची शिवसेना संजय राऊत यांनी संपवण्याचा विडा उचलल्याचे दिसत आहे असा खोचक टोलाही लगावला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले आहे. त्या दिवसापासूनच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत तसंच आदित्य ठाकरे हे सातत्याने निवडणूक आयोगावर टीका करत आहेत. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा चुकीचा आहे. आमचा निवडणूक आयोगावर विश्वास नाही हे उद्धव ठाकरे सातत्याने सांगत आहेत. तर दुसरीकडे आजही संजय राऊत यांनीही ठाकरेंशिवाय शिवसेना असूच कशी शकते असा प्रश्न उपस्थित केला आहे.