तीन भरारीसह एकूण सहा पथकांची नियुक्ती : लोकसभेच्या तुलनेत मतदान केंद्रही वाढली
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील महत्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या भोसरी मतदारसंघात यावेळी चुरशीची लढाई होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत निवडणूक विभागानेही मतदान शांततेत पार पाडण्यासाठी कंबर कसली असल्याचे दिसत आहे. उमेदवारांकडून होणारा छुपा प्रचार, मतदारांना देण्यात येणारी प्रलोभने या माध्यमातून आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तीन भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या भरारी पथकांच्या मार्गदर्शनाखाली आणखी तीन पथके नियंत्रणाचे काम पाहणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर 18 हजार मतदार वाढल्यामुळे मतदान केंद्राची संख्याही वाढली असून लोकसभा निवडणुकीपेक्षा 24 मतदान केंद्र अधिक असणार आहेत.
99 मतदान केंद्र आली तळमजल्यावर मतदान करताना दिव्यांग मतदारांना त्रास होऊ नये म्हणून सर्व मतदान केंद्र तळमजल्यावर ठेवा, अशा सूचना निवडणूक आयोगाने केल्या होत्या. त्यानुसार भोसरी मतदान संघामधील मतदान केंद्रांमध्येही बदल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी 99 मतदान केंद्रे ही पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर होती. या सर्व मतदान केंद्रांमध्ये आता बदल करण्यात आले असून ही मतदान केंद्रे तळमजल्यावर आणली जाणार आहेत. तसेच काही मतदान केंद्रावर तळमजल्यावर खोल्या उपलब्ध नसतील तर त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात शेडची उभारणी करण्यात येणार आहे.
लोकसभेमध्ये हा मतदारसंघ शिरुर लोकसभा मतदारसंघाला जोडला गेलेला आहे. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये 4 लाख 13 हजार 680 एवढे मतदार होते. मात्र, मागील तीन महिन्यांमध्ये नवीन 18 हजार 835 मतदार वाढले असून आता 4 लाख 32 हजार 515 मतदार झाले आहेत. मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे मतदान केंद्रेही वाढली आहेत. त्यामुळे विधानसभेसाठी आता 411 मतदान केंद्रावर मतदारांना आपल्या मतधिकाराचा उपयोग करता येणार आहे. यापैकी 35 मतदान केंद्रे ही सहाय्यक मतदान केंद्रे म्हणून उभारण्यात येणार आहेत.
लोकसभा निवडणुकीवेळी 376 मतदान केंद्रे होती. लोकसभा निवडणुकीत अनेक मतदान केंद्रांवर मतदानाची संख्या दीड हजारापेक्षा जास्त होती. अशा मतदान केंद्राच्या ठिकाणी सहाय्यक मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. 35 ठिकाणी अशी सहाय्यक मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे, जास्त मतदार संख्या असलेल्या मतदान केंद्रावर आता गर्दी होणार नाही.
मतदार संघात 44 झोन विधानसभेची निवडणूक शांततेत पार पाडली जावी, यासाठी मतदार संघात वेगवेगळे 44 झोन तयार करण्यात आले आहेत.
त्यानुसार, प्रत्येक झोन सोठी एक अशा पद्धतीने विभागीय अधिकाऱ्यांची नेमणूक करुन त्यांना जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. तर मतदारसंघात होणारी पैशांची उलाढाल, आचारसंहिता भंग करणाऱ्यावर नजर ठेवण्यासाठी तीन भरारी पथके सक्रिय करण्यात आली असून या भरारी पथकामध्ये निवडणूक विभागाचा एक अधिकारी, एक पोलीस उपनिरीक्षक व चार इतर कर्मचारी यांचा समावेश असणार आहे. शिवाय या पथकाच्या मदतीसाठी आणखी तीन संनिरीक्षण पथके असणार आहेत. या पथकामध्येही एक अधिकारी आणि तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे, निवडणुकीत होणारी आर्थिक उलाढाल, मतदारांना दाखवण्यात येणारी प्रलोभने यावर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक विभाग सतर्क झाल्याचे दिसत आहे.