सोरतापवाडी -शेतकऱ्यांना नगदी बाजारभाव मिळणारे पीक म्हणून कांदा पिकाकडे पाहिले जाते. कधी भाव वाढले म्हणून सर्वसामान्य ओरड करतात तर योग्य भाव नाही मिळाला म्हणून शेतकरी त्रस्त असताना दिसतात. या दोघांमध्ये मात्र व्यापारी वर्ग, वाहतूक करणारे, हमाल, औषधे विक्रेते मालामाल होतात.
शेती परवडतच नाही हा सर मात्र मग शेतकऱ्यांचा सुरू होतो. त्याला बाजार भावाचे चढ उतार हे देखील एक कारण आहे. दरवर्षी फेब्रुवारीच्या मध्यात कांद्याला बऱ्यापैकी दर मिळत असतो. पण यंदा दरात मोठी घट झाली. सध्या कांद्याला सरासरी 700 ते 900 रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. या दरात उत्पादन खर्चही वसूल होत नाही, असं शेतकरी सांगतात.
आशियातील सर्वात मोठ्या कांदा मार्केटमध्ये सध्या सरासरी 700 रुपये दर मिळतोय. मागील हंगामात याच काळात 2 हजार 400 रुपये दर होता. तर 2021 मध्ये 3 हजार 800 आणि 2020 मध्ये 2000 रुपये भाव होता. म्हणजेच यंदा कांद्याचे दर निम्मेही नाहीत.
कांद्याला बाजार मिळो अथवा न मिळो; मात्र कांदा लावण्यापासून ते बाजार पेठेत नेऊन विकण्यापर्यंत होणारा खर्च काही चुकत नाही. रोपांची व लागणाऱ्या औषधांची सतत वाढत असलेल्या किमती, शेतीची मशागत, वाहतूक, बाजारपेठ पर्यंत जाईपर्यांत होणारा खर्च पकडता हातात फक्त फाटक्या गोण्या राहिलेल्या असतात. शासनाने याबाबत नीट विचार करावा हमीभाव द्यावा ही विनंती.
-माऊली माथेफोड, प्रगतशील शेतकरी आळंदी म्हातोबा
बाजार भावाचा व व्यापाऱ्यांच्या लहरीपणामुळे कांदा पीक घेणे बऱ्यापैकी बंद केलेले आहे. त्यापेक्षा फळबाग करून दोन पैसे गाठीशी उरतात. नोकरदार वर्गाला दरवर्षी महागाई भत्ता वाढून मिळतो मात्र शेतकऱ्याला तो देखील हक्क नाही. पिकाला स्वतःच्या पोराप्रमाने वाढवायचे आणि देताना मात्र कवडीमोल किमतीत विकायचे. बाजारातून येताना कधी कधी तर अशी वेळ येते की खर्च न निघता उलट कर्जच डोक्यावर घेऊन शेतकरी घरी येत असतो.
-शिरीष चंद, प्रगतशील शेतकरी