लखनऊ : आजपर्यंत तुम्ही आपल्या मित्रांसोबत कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून पैज लावली असेलच…त्यात तुम्ही किंवा तुमचा मित्र जिंकलाही असेल…पण जर एखाद्या क्षुल्लक गोष्टीवरून लावलेली पैज तुमच्या किंवा तुमच्या मित्राच्या जीवावर बेतली तर…होय अशीच एक घटना समोर आली.
मित्राशी गंमतीत लावलेली पैज मृत्यूचे कारण ठरल्याची घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथे ही घटना घडली आहे. एका व्यक्तीचा 50 अंडी खाण्याच्या पैजेपायी मृत्यू झाला आहे. एका वृत्तवाहिनीने याविषयीची माहिती दिली आहे.
शुक्रवारी संध्याकाळी सुभाष यादव नावाचा व्यक्ती अंडी खाण्यासाठी मित्रासोबत बीबीगंज बाजारात गेले होते. अंडी खाताना, कोण किती अंडी खाऊ शकते याबाबत दोघांमध्ये चर्चा सुरू होती आणि गंमती गंमतीत दोघांमध्ये अंडी खाण्यावरुन पैज लागली. 50 अंडी आणि एक बाटली दारु पिण्याची ही पैज जिंकण्यास दोन हजार रुपये देण्याचे ठरले.
सुभाषने पैज मान्य केली आणि अंडी खायला सुरूवात केली. त्यांनी 41 अंडी खाल्ली, पण 42 वं अंडं खाताच ते बेशुद्ध झाले. तेथे उपस्थित लोकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याचे पाहून तेथून सुभाष यांना लखनऊच्या रुग्णालयात हलवले. तेथे रात्री उशीरा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
सुभाष यांनी याच वर्षी दुसऱ्यांदा लग्न केले होते. पहिल्या पत्नीपासून चार मुली झाल्यामुळे मुलासाठी त्यांनी नऊ महिन्यांपूर्वीच दुसरा विवाह केला होता. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष यांची दुसरी पत्नी सध्या गर्भवती आहे. परिसरात ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे.