निखील स. जगताप
बेलसर -शिक्षण हा संविधानाने दिलेला मूलभूत हक्क आहे. शिक्षणामुळे माणूस साक्षर होतो आणि साक्षरतेच्या जोरावर महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. मागील दोन वर्षांच्या करोनाच्या कालखंडामध्ये शिक्षण क्षेत्रांसोबतच इतर क्षेत्रांनाही मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागले आहे.
शिक्षण क्षेत्र हा सर्व व्यवस्थेचा पाया मानला जातो; परंतु करोना कालखंडामध्ये सुरू झालेल्या ऑनलाइन शिक्षण प्रणालीमुळे प्रशासना सोबतच विद्यार्थी, पालक आणि संबंधित व्यावसायिक यांना नवनवीन आव्हाने आणि संधींना सामोरे जावे लागत आहे.
करोनाने थैमान घातल्यानंतर अनुषंगाने शाळा बंद करण्यात आल्या आणि ऑनलाइन शिक्षण प्रणाली सुरू करण्यात आली. ऑनलाइन शिक्षण प्रणालीमुळे शिक्षण व्यवस्थेसमोर एक मोठे आव्हान उभे राहील ऑनलाइन शिक्षण व्यवस्थेचे अनेक फायदे तोटे पालक शिक्षक आणि इतर समाजास सहन करावे लागत आहेत.
मुलांच्या मानसिकतेमध्ये होणारे बदल, त्यासोबतच विद्यार्थ्यांना मिळणारी बौद्धिक चालना, तसेच गुणवत्ता, शारीरिक विकास, आरोग्य यावर होणारे चांगले-वाईट परिणाम ऑनलाइन शिक्षण प्रणालीमुळे दिसून आले.
बालभारतीने केलेल्या पीडीएफ स्वरूपातील पुस्तकांना राज्यभरातून 1 कोटी 51 लाख डाउनलोड मिळाले आहेत; परंतु प्रत्यक्षात त्याचा फायदा होणार किती हा मोठा प्रश्न आहे.ऑनलाइन होणारे लेक्चर यामुळे विद्यार्थ्यांची बौद्धिक गुणवत्ता किती पटीने वाढणार यावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.
पुरंदर तालुक्यामध्ये 18 ते 19 शाळांमध्ये रेंजची समस्या असल्याने त्या ठिकाणी शिक्षक प्रत्यक्षात जाऊन तास घेत आहेत. ऑनलाइन शिक्षणापेक्षा ऑफलाइन शिक्षण सुरू करण्यास पालक आणि विद्यार्थ्यांची मागणी आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यातील एकाग्रता कमी होऊन चिडचिडेपणा वाढला आहे.
त्यामुळे करोनाचे सर्व नियम पाळून ओसरी शाळा सुरु करून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. कृतीपत्रिका, दीक्षा ऍप त्यासोबतच गोष्टींचा शनिवार, शिकू आनंदे अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षण विभाग विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचण्यास सक्रिय आहे. दिवाळी नंतर शाळा सुरू होण्याची शक्यता आहे.
– मोहन गायकवाड, गटशिक्षणाधिकारी, पुरंदर तालुका
शिक्षण क्षेत्राशी निगडित व्यवसाय धोक्यात
शाळा म्हटली की गणवेश, वह्या पुस्तके खरेदी, नवीन दप्तर खरेदी त्यासोबतच इतर स्टेशनरी खरेदी करण्यासाठी विद्यार्थी उत्साही असतात; परंतु शाळा बंद असल्यामुळे या व्यवसायांवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे या व्यवसायासमोर मोठी आव्हाने उभी राहिली आहेत. खासगी क्लासेस यावरही निर्बंध आल्याने ते डबघाईला आले आहेत.
ओसरी शाळा ठरली प्रभावी
सध्याच्या कालखंडामध्ये बहुसंख्य शिक्षकांनी ओसरी शाळा च्या माध्यमातून शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक अनोखे पाऊल उचलले आहे. घरोघरी जाऊन घराच्या ओसरीमध्ये समोर बसून ओसरी शाळा घेतली जाते आणि विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. या उपक्रमाचे विविध स्तरातून कौतुक होत आहे
शिक्षकांसमोर मोठी आव्हाने
ऑनलाइन प्रणालीमुळे शिक्षकांवर अधिकचा ताण निर्माण होत आहे. ऑनलाइन क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांचे लक्ष नसणे विद्यार्थ्यांना बजावून सांगणे त्यासोबतच मुलांचे हस्ताक्षर आणि आकलन क्षमता सुधारण्यासाठी शिक्षकांना अधिकचे कष्ट घ्यावे लागत आहे. त्यासोबतच पोषण आहार वाटपासाठी विद्यार्थ्यांना वारंवार सूचना देऊन प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आहार वाटप करण्यात कुशलता दाखवावी लागत आहे.