नवी दिल्ली :- देशांतर्गत प्लास्टिक क्षेत्राने अलिकडच्या वर्षांत उत्तम कामगिरी केली आहे. त्यात आणखी वाढ होण्याची प्रचंड क्षमता आहे, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे.
भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात प्लास्टिक क्षेत्राचे योगदान अतुलनीय आणि अमूल्य असेल. मुंबईत आयोजित प्लास्टिक उद्योगाच्या वृद्धीसाठी दुसऱ्या तंत्रज्ञान परिषदेत दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करताना ते बोलत होते.
पीयूष गोयल म्हणाले, वर्ष 2020 पर्यंत देशाची निर्यात सुमारे 500 दशलक्ष डॉलर्सपर्यंत स्थिर होती. मात्र गेल्या दोन वर्षांत परिस्थिती बदलली आहे आणि देशाने निर्यात क्षेत्रात 776 दशलक्ष डॉलर्सचा टप्पा गाठला आहे. यात प्लास्टिक उद्योगाचे योगदान 12 अब्ज डॉलर्सचे आहे आणि त्यात वाढ होण्याची क्षमता आहे.
नजीकच्या भविष्यात या उद्योगाच्या सुव्यवस्थित विकासासाठी सरकार या क्षेत्राच्या सूचना ऐकण्यासाठी सदैव तयार आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्लास्टिक उद्योगाने मुक्त व्यापार कराराचा विशेष लाभ घ्यावा आणि त्यांनी आपली व्याप्ती विस्तारावी, नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करावा आणि मोठ्या प्रमाणात निर्यातीला प्रोत्साहन देण्याचे आवाहन त्यांनी केले.
यूएई, ऑस्ट्रेलियाकडून आयातीची शक्यता…
यूएई आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांकडून या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आयात होण्याच्या शक्यता आहे. सरकार वस्तूंच्या गुणवत्ता आणि उच्च दर्जासाठी प्रयत्नशील असून या क्षेत्रात निकृष्ट उत्पादन स्वीकारार्ह नसून गुणवत्तेला महत्त्व आहे. यामुळे सरकार अधिक विश्वासार्ह आणि जागतिक मानकांच्या बरोबरीने उत्पादन बनवण्याच्या अनुषंगाने उद्योगांकडून सूचनांची वाट पाहत आहे आणि त्याची त्वरित अंमलबजावणी करेल, असे गोयल यांनी सांगितले.