नवी दिल्ली – भारताचा जागतिक पातळीवरील प्रभाव वाढत आहे. त्यामुळे भारताच्या चलनाचे महत्त्वही वाढत आहे. अशा परिस्थितीत श्रीलंका, बांगलादेश आणि इतर अनेक देश भारताबरोबर रुपयाच्या माध्यमातून व्यवहार करण्यास उत्सुक आहेत, असा दावा केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल ( Piyush Goyal) यांनी पुन्हा केला आहे.
आखातातील बरेच देशही या संदर्भात भारताबरोबर चर्चा करीत आहेत. यामुळे दोन्ही देशांदरम्यानचा व्यापार करण्याचा खर्च कमी होऊ शकतो. बांगलादेश आणि श्रीलंका या संदर्भात भारताबरोबर चर्चा करीत आहेत. ही चर्चा अंतिम टप्प्यात आहे. असा प्रयोग अनेक देशाबरोबर होऊ शकतो. तसे झाले तर भारताची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होईल. सिंगापूरबरोबरही या संदर्भात चर्चा चालू असल्याची माहिती त्यांनी दिली.
भारताने संयुक्त अरब अमिरातीबरोबर अशा प्रकारचा व्यवहार सुरू केला आहे. त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. दोन्ही देशांदरम्यान व्यापार तिसर्या देशाच्या चलनातून झाला तर चलन विनिमयाला उशीर लागतो. त्याचबरोबर दोन्ही पक्षांना पैशाची देवाण-घेवाण करताना उशीर होतो. अशा परिस्थितीत दोन्ही देशांनी परस्परांच्या चलनाच्या माध्यमातून व्यापार केला तर तो दोन्ही देशासाठी जास्त नफादायका असतो.
अनेक वर्षापासून भारतीय रुपयाचे मूल्य जागतिक चलन बाजारात कमालीचे स्थिर आहे. याचाही संबंधित देशांना फायदा होत आहे. सध्या डॉलरची चणचण असल्यामुळे रुपयाच्या माध्यमातून अनेक देश यशस्वीरित्या व्यापार करीत आहेत असे त्यांनी सांगितले.
यासंदर्भात भारतीय बँकांनी उत्तम कामगिरी केली आहे. भारतातील बँकांच्या माध्यमातून रुपयाच्या माध्यमातून व्यापार करण्यास मदत मिळत असल्याचे गोयल यांनी सांगितले. भारताने अनेक देशाबरोबर मुक्त व्यापार करार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे विविध देशाबरोबर भारताचा व्यापार वाढू शकेल आणि भारताला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळू शकेल असे त्यांनी सांगितले.