दिग्रस (यवतमाळ) – समान नागरी कायद्याला आमचा पाठिंबा असून आम्ही “एक राष्ट्र, एक कायदा’ समजू शकतो. पण भाजपची “एक देश, एक पक्ष’ ही योजना कधीही होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा लोप पावत असल्याचा दावा केला.
विदर्भातील दोन दिवसांच्या दौऱ्याची सुरुवात उद्धव ठाकरेंनी आज पोहरादेवीचे दर्शन घेत केली. यानंतर उद्धव ठाकरे यांची यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे जाहीर सभा झाली. या सभेला संबोधित करताना त्यांनी भाजप, संजय राठोड आणि भावना गवळी यांच्यावर टीकास्त्र सोडले. तसेच निवडणूक आयोगावरही निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले. हे सध्या गद्दारांचे, लाचारांचे सरकार आहे. हा संतांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे महाराष्ट्राची ओळख गद्दारांचा महाराष्ट्र होऊन देणार नाही. तसेच आता राष्ट्रवादी चोरायची काय गरज होती, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
आमदार, खासदार गेले तरी माझे दमदार शिवसैनिक आमच्या पाठिशी आहेत. तसेच आता खोक्यातून सरकार तयार होत असल्याचे म्हणत त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर निशाणा साधला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत त्यांनी म्हटले की, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा ओसरल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
त्यांनी “बजरंग बली की जय’चा नारा दिला, पण देवाने गदा मारली आणि कर्नाटकात भाजपचा सुपडा साफ झाला. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी भ्रष्ट म्हटले होते आता त्याच पक्षाच्या नेत्यांबरोबर पंतप्रधानांचा फोटो आहे.
देवेंद्र फडणवीस यांची अवस्था “एक फुल, दोन हाफ’ अशी झाली आहे. मला घरात बसून जनतेचा आशीर्वाद मिळाला, त्यांना दारोदार फिरुनही आशिर्वाद मिळत नाही. तर भ्रष्टाचारी भाजपमध्ये गेल्यावरच शुद्ध कसे होतात, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
आम्हाला सुप्रीम कोर्टाची दारे खुली
विधानसभेच्या अध्यक्षांनी शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या संबंधात बजावलेल्या नोटीसांच्या संबंधात बोलताना ते म्हणाले की, या संबंधात सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात सर्व बाबी स्पष्ट केल्या आहेत. अध्यक्षांना त्या चौकटीतच निर्णय घ्यावा लागणार आहे. त्या बाहेर जाऊन निर्णय घेतला गेल्यास आम्हाला सर्वोच्च न्यायालयाची दारे खुली आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.