हिमांशू
मस्त चाललंय ना सगळं? युती, आघाडी, इकडून तिकडे, तिकडून इकडे… कुणाला किती जागा, कुणाला कुठली जागा, कोण कुणाला सोडून गेलं, कुणाची कुठे उपस्थिती, कुणाची कुठे दांडी, कोण नाराज, कुणाला लॉटरी, कुणाची किती मतं कोण खाणार… इत्यादी, वगैरे! आपल्याला एखाद्या गोष्टीचा “फीवर’ एकदा चढला की दुसरं काही सुचतच नाही. इतर काही दिसत नाही आणि ऐकूही येत नाही. राजकीय रस्सीखेच दाखवणाऱ्या, डाव-प्रतिडावाच्या बातम्यांनी टीव्हीचा पडदा व्यापलेला. कुणाकुणाचं राजकीय करिअर पणाला लागलंय, या चर्चेत आपल्याला भलताच रस.
नातेवाईकांना, मित्रांना फोन केला तरी “तुमच्याकडे काय वातावरण?’ हा पहिला प्रश्न. मग तिकडून उत्तर येतं, “यंदा दणका आहे अमक्या-तमक्याला!’ खरं तर परिस्थितीचा पूर्ण अंदाज दोघांनाही आलेला नसतो; पण आपलं अगाध राजकीय ज्ञान दाखवण्याची तीव्र इच्छा दोघांनाही असते. सोशल मीडियावर तर महापूर आलेला! आपल्यावर कुणी राज्य करायचं यात आपल्याला इतका इन्टरेस्ट, की राज्य कसं करावं, हा प्रश्नच बॅकसीटला पडलाय.
जमिनीच्या ज्या तुकड्यावर राज्य करायचंय, तो या पृथ्वीचा एक भाग आहे आणि उद्या पृथ्वीलाच धोका निर्माण झाला तर काय करायचं? हा प्रश्न आपल्याला अजूनही पडत नाही. “जो होगा, देखा जाएगा’ अशा मस्तीत आपण वावरतो आहोत. सगळ्यांचं होईल तेच आपलं होईल, अशी बेफिकिरी!
अशा वातावरणात “तुम्ही आम्हाला फसवलंय,’ असं ग्रेटा थनबर्ग नावाची अवघी सोळा वर्षांची मुलगी जगभरातल्या तमाम राज्यकर्त्यांना का खडसावते, हा विचार करायला आपण वेळ कुठून काढणार? आपले तमाम नेते नव्या पिढीला आवाहन करतात, “फर्स्ट टाइम व्होटर्स’ सगळ्यांना महत्त्वाचे वाटतात; कारण भारत आजघडीला सर्वांत तरुण देश आहे. या पार्श्वभूमीवर, दर शुक्रवारी शाळा बुडवून “संपूर्ण जगात पर्यावरणीय आणीबाणी घोषित करा,’ या मागणीसाठी स्वीडनच्या संसदेसमोर बसणारी ही पोरगी आपल्याकडे चर्चेचा विषय ठरत नाही.
20 सप्टेंबरला तिच्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झालं आणि तिला पाठिंबा देण्यासाठी जगभरातली 50 लाख मुलं रस्त्यावर उतरली. 20 ते 27 सप्टेंबर हा हवामान आठवडा म्हणून जगभरात पाळला गेला. तिच्या आंदोलनाची दखल घेत इंग्लंडने जगात सर्वप्रथम “पर्यावरणीय आणीबाणी’ घोषित केली आहे. वयाच्या आठव्या वर्षांपासून हवामानात होणाऱ्या बदलांच्या दुष्परिणामांबद्दल ग्रेटा ऐकत होती. प्राणी आणि वनस्पतींच्या 200 प्रजाती दरवर्षी नष्ट होत आहेत, हे ऐकून ती अस्वस्थ झाली. मानवजातही अशीच एक दिवस नामशेष होईल, म्हणून जगाला सावरण्यासाठी ती आखाड्यात उतरली. सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करून ती थांबली नाही, हे महत्त्वाचं!
“खोटे शब्द देऊन माझं बालपण उद्ध्वस्त करण्याची हिंमत तुम्हाला झालीच कशी,’ असा रोखठोक सवाल ग्रेटाने जगभरातल्या नेत्यांना विचारला. हवामान बदलाच्या झळा सोसणारी, मरणारी माणसं आणि लयाला चाललेल्या पर्यावरणीय परिसंस्थांविषयी बोलताना तिच्या डोळ्यात पाणी आलं. “आपण सामूहिक विनाशाच्या दिशेनं चाललो असताना तुम्ही फक्त पैशाचं का बोलताय,’ हा जगाला तिनं विचारलेला प्रश्न आपल्याला कसा कळणार? आपल्याकडे “विकास’ हाच अजेंडा; पण त्याची व्याख्या कुणालाच माहीत नाही!