अहमदाबाद – गुजरात सरकारने कोविड मृतांचा जो आकडा जाहींर केला होता त्याच्या जवळपास दुप्पट कोविड मृतांना आत्तापर्यंत नुकसानभरपाई दिली गेली असल्याची माहिती खुद्द गुजरात सरकारकडूनच देण्यात आल्याने गुजरात सरकारने कोविड मृतांचे खरे आकडे लपवल्याची बाब उघड झाली आहे.
त्यावरून आज गुजरात सकारने मासलेवाईक खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, कोविड मृतांना नुकसानभरपाई देण्याबाबत आरोग्य मंत्रालयाने जी व्याख्या निश्चित केली आहे ती व्याख्या आणि सुप्रिम कोर्टाने या बाबत जे निकष जाहीर केले आहेत ते वेगवेगळे असल्याने मृतांच्या आकड्यात ही तफावत दिसून आली आहे.
गेल्या आठवड्यात कोविड मृतांच्या नुकसानभरपाई बाबत गुजरात सरकारने जे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की, आत्तापर्यंत राज्यातील 16 हजार 175 कोविड मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने प्रत्येकी 50 हजार रुपयांची नुकसानभरपाई दिली आहे. तथापि गुजरात सरकारने अधिकृतपणे आपल्या राज्यातील कोविड मृतांचा आकडा 10 हजार 99 इतकाच असल्याचे म्हटले होते.
त्यामुळे गुजरात सरकारने मृतांची खरी आकडेवारी लपवून ठेवल्याचे सिद्ध झाले आहे असा दावा केला जात आहे. गुजरात मधील नुकसानभरपाईच्या मागणीचे एकूण 34 हजार अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे त्या राज्यातील कोविड मृतांचा आकडा प्रत्यक्ष जाहीर झालेल्या 10 हजार 99 पेक्षा कितीतरी अधिक असल्याचे दिसून आले आहे. आता या बाबत खुलासा करण्यास विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी टाळाटाळ सुरू केली आहे.
आरोग्य विभागाच्या प्रमुखांनी याबाबत महसूल विभागाकडे बोट दाखवले आहे तर महसूल विभागाचे मंत्री राजेंद्र त्रिवेदी यांनी या बाबत कानावर हात ठेवले ते म्हणाले की, आमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी नेमके काय प्रतिज्ञापत्र सादर केले आहे याची मला कल्पना नाही, माहिती घेतो आणि सांगतो. तथापि नुकसानभरपाईच्या निकषाबाबत केंद्राच्या आरोग्य विभागाचे निकष आणि सर्वोच्च न्यायालयाने जाहींर केलेले निकष यात तफावत असल्याने आकडेवारीत ही तफावत झाली असावी, असा तर्क मंत्र्यांनी मांडला आहे.
राज्यात ज्या रुग्णांना कोविड झाला आहे पण ज्यांचा मृत्यू हदवविकार किंवा अन्य अवयव निकामी झाल्यामुळे झाला असेल तर अशा रुग्णाला कोविड मृत म्हणून नोंदवायचे नाही असे राज्य सरकारच्या एका समितीने ठरवले होते त्यामुळेही ही आकडेवारीतील तफावतत दिसत असावी असेहीं या मंत्र्यांनी म्हटले आहे.
सुप्रीम कोर्टाने मात्र ही नुकसानभरपाई देण्याच्या संबंधात स्पष्ट निर्देश दिले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, एखादा रुग्ण कोविड पॉझिटीव्ह म्हणून दिसून आल्यानंतर त्याच्या 30 दिवसाच्या आत जर त्याचा मृत्यू झाला असेल तर तो कोविड रुग्ण समजून त्यांना सरसकट ही नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे, त्यांच्या बाबतीत अन्य कोणत्याही मुद्द्य्ाचा विचार करता कामा नये असे कोर्टाने म्हटले होते.