नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी लोकांना ‘मेक इंडिया नंबर 1’ मोहिमेत मिस कॉल द्वारे सामील होण्याचे आवाहन केले. त्यासाठी पक्षाने कॉल नंबर जारी केला आहे. 9510001000 असा हा मोबाईल नंबर असून ज्यांना या मिशनमध्ये सामील व्हायचे आहे, ज्यांना भारताला जगातील नंबर 1 राष्ट्र, सर्वात शक्तिशाली राष्ट्र, तसेच सर्वोत्तम राष्ट्र म्हणून पाहायचे आहे त्यांनी यात सामील व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
सर्व देशवासियांना मिशनशी जोडण्याचे आमचे उद्दीष्ठ आहे असे ते म्हणाले. या देशातील प्रत्येक नागरिकाला, 130 कोटी लोकांना या मिशनशी जोडले पाहिजे.”स्वातंत्र्याला 75 वर्षे झाली. या 75 वर्षात आपण खूप काही मिळवले, भारताने खूप काही मिळवले असले तरीही एक संताप लोकांच्या मनात आहे. त्यांचा एक प्रश्न आहे की आपल्यानंतर स्वातंत्र्य मिळालेल्या अनेक छोट्या राष्ट्रांनी आपल्याला मागे टाकले. भारत का मागे पडला? असा सवाल प्रत्येक नागरिक करत आहे.
देशाच्या सभ्यतेचे कौतुक करताना ते म्हणाले की, ती हजारो वर्षे जुनी आहे, भारत हा एक महान देश आहे. देशभरात प्रत्येक मुलाला चांगले आणि मोफत शिक्षण मिळायला हवे. आरोग्य सेवेसाठी प्रत्येक व्यक्तीला चांगले आणि मोफत उपचार मिळायला हवेत. आपण आता हे काम युद्धपातळीवर सुरू केले पाहिजे. तरच भारत पहिल्या क्रमांकाचा देश बनेल असे ते म्हणाले.