मुंबई: राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात येणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांचे नियोजित सर्वच कार्यक्रम आणि दौरे रद्द केले आहेत. त्यांच्यासह पक्षातील अनेक नेत्यांनी आपल्या दौऱ्यांबाबत मोठे निर्णय घेतले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी त्यांचे सर्व दौरे रद्द केले आहेत. नागरिकांची गर्दी होऊ नये आणि कोरोना नियमांचे पालन केले जावे यासाठी त्यांनी हे दौरे रद्द केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. तसेच आज सकाळी त्यांनी नागरिकांच्या भेटी घेणे ही टाळले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मी माझे २२ फेब्रुवारी ते ७ मार्चपर्यंतचे सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहेत.नियोजित कार्यक्रमानुसार सोमवार दि. २२ फेब्रुवारी रोजी मी पुणे येथील कार्यालयात भेटींसाठी उपलब्ध राहणार होते.
— Supriya Sule (@supriya_sule) February 21, 2021
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही उद्यापासूनचे म्हणजे 23 फेब्रुवारीपासूनचे पुढचे सर्व दौरे रद्द करण्यात येत असल्याचे ट्विटरवरून स्पष्ट केले आहे. सर्वांच्या आरोग्याचा विचार करता हा निर्णय आवश्यक देखील आहे. हे लक्षात घेता, 22 फेब्रुवारी ते 7 मार्चपासूनचे सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम व दौरे पुढे ढकलण्यात आले आहेत, याची कृपया नोंद घ्यावी ही नम्र विनंती. माझे सर्वांना आवाहन आहे की, सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरा, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करा. शासनाने वेळोवेळी घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांनी उद्या होणारा त्यांचा हिंगोली दौरा रद्द केला आहे. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचं आयोजन केलं आहे. त्यानिमित्ताने ते हिंगोलीला येणार होते. परंतु कोरोनाची लागण झाल्याने त्यांनी हा दौरा रद्द केला आहे, अशी माहिती हिंगोलीचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी दिली आहे.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आजचा वरळी येथील कार्यक्रम रद्द केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आज २२ फेब्रुवारी २०२१ रोजी होणारा उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @ वरळी, मुंबई हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास हा कार्यक्रम घेतला जाईल. तसेच तुमच्या सर्व अडचणी अर्ज रुपाने कार्यालयातील ड्रॉप बॉक्समध्ये द्यावेत किंवा तुम्हाला काही अडचणी आल्यास माझ्या मंत्रालयात संपर्क साधावे, असे आवाहन सामंत यांनी केले आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.