बारामती (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात लॉक डाऊन आहे. अशा परिस्थितीमध्ये शहरातील गरजू व्यक्ती व कुटुंबांना मदत करण्यासाठी बारामतीकर सरसावले आहेत. बारामती नगरपरिषदेसह विविध सहकारी व सामाजिक संस्था तसेच व्यापारी संघटना या कार्यात जोडल्या जात आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून बारामती शहरातील ७ हजार गरजू कुटुंबांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार शहराध्यक्ष इम्तियाज शिकिलकर, नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, उपाध्यक्ष तरन्नुम सय्यद, माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, गटनेते सचिन सातव व नगरसेवक, नगरसेविका यांनी शहरातील मोलमजुरी, घरकाम, दैनंदिन काम करणाऱ्या तसेच मदतीची गरज असलेल्या ७ हजार कुटुंबांचे सर्वेक्षण करून यादी तयार केली.
ज्यांचे प्रपंच रोजच्या रोज मोलमजुरी, घरकाम, दैनंदिन कामावर अवलंबुन आहे अशा नागरिकांचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. सदर ७ हजारहुन अधिक कुटूंबांना प्रत्येकी अन्न धान्य व तेल ( एका किटमध्ये प्रत्येकी २.५ किलो गहु + २.५ किलो तांदुळ + १ किलो दाळ + १ किलो तेल ) अशी मदत होणार आहे. याकामी बारामती मर्चट असोसिएशन व बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्यांनी जबाबदारी घेतली. त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रताप सातव बारामती मर्चंट असोसिएशनचे बाळासाहेब फराटे यांचे विशेष सूहकार्य मिळाले.
राष्ट्रवादी कॉँग्रेंस भवन कसबा येथे जीवनावश्यक वस्तूंचे कीट तयार करण्याचे काम सुरू आहे . तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, नगरसेवक सातव व काशिविश्वेश्वर तरुण मंडळाचे सदस्य यांच्यामार्फत स्वच्छतेचे सर्व नियम पाळून ७ हजारहुन अधिक किट तयार केले आहेत. सदर किट शहर व वाढीव हद्दीतील रोजच्या रोज मोलमजुरी, घरकाम, दैनंदिन काम करणा-या गरजु कुटूंबांना घरपोच देण्यात आले. या कामामध्ये बारामती शहरातील राष्ट्रवादी कॉग्रेंस पार्टीचे सर्व आजीमाजी नगरसेवक, बुथ कमिटी सदस्य व शहरातील विविध मृंडळांचे सहकार्य लाभले. अशा प्रकारे रोजच्या रोज मोलमजुरी, घरकाम, दैनंदिन काम करणा-या कुटूंबांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून एक हात मदतीचा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असे सचिन सातव यांनी सांगितले.
१ एप्रिलपासून बारामती शहरात शासनामार्फत रेशनिंग दुकानावर विविध योजनेअंतर्गत धान्य उपलबध आहे. यामध्ये अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत माणसी २ रुपये किलो प्रमाणे ३ किलो गहु व ३ रुपये किलो प्रमाणे २ किलो तांदूळ मिळणार आहे. तसेच अंत्योदय शिधापत्रिका धारकांना ३५ किलो धान्य मिळणार असुन एप्रिल, मे, जून हे तीन महिने शासनाकडून प्रत्येकी माणसी ५ किलो तांदूळ मोफत मिळणार आहे.
रेशन दुकानदारांनी शासन निर्णयाच्या आदेशाचे पालन करून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करावे. जो रेशन दुकानदार आदेशाचे पालन करणार नाही त्याच्याविरुद्ध लाभार्थी आवाज उठवतील. कर्तव्यात कसूर करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचे आश्वासन तहसीलदार यांनी दिले आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असेही बारामती नगर परिषदेचे गटनेते सचिन सातव यांनी सांगितले.