बारामती – बारामती औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) दि. 1 मे रोजी पासून काही अटी व शर्तीवर सुरू करण्याची शक्यता निर्माण झाली असली तरी त्यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. तर दि. 1 मे पासून औद्योगिक वसाहतीचे चाके फिरण्यास सुरू करण्यास प्रशासन परवानी देणार का? याकडे कर्मचाऱ्यांसह कारखानदारांचे लक्ष लागले आहे.
बारामती औद्योगिक वसाहतीतील कारखाने सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी तसेच कामगारांना पास देण्यात यावेत, अशी मागणी बारामती चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. याच धर्तीवर उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना मंगळवारी (दि. 28) आढावा बैठक घेतली. त्यात त्यांनी एमआयडीसीचा पूर्ण आढावा घेतला. याप्रसंगी बारामती चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद काकडे, कार्याध्यक्ष दत्ता कुंभार, पांढरीनाथ कांबळे, स्वप्नील पाटील, महेश बल्लाळ, पुस्तके, सदाशिव पाटील, चंद्रकांत काळे, मिश्रा, अविनाश लगड, आदि उद्योजक उपस्थित होते.जिल्ह्यातील चाकण, जेजुरी, कुरकुंभ व इंदापूर एमआयडीसी सुरू करण्यात आली आहे.
मात्र, बारामतीत करोनाचे रुग्ण आढळल्याने बारामती रेड झोनमध्ये असल्याने एमआयडीसीही बंद ठेवण्यात आली आहे. सध्या बारामती येथील परिस्थिती नियंत्रणाखाली असून बारामती एमआयडीसीतील कारखाने सुरू करण्यासाठी सूचना करावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे करण्यात अली होती.
राज्यामध्ये औरंगाबाद व काही ठिकाणी कारखाने सुरू झालेले आहेत व शासन ही जास्तीत जास्त कारखाने सुरू व्हावेत म्हणून प्रयत्न करीत आहे. त्यामुळे बारामतीतील उद्योजक योग्य ती खबरदारी घेत कारखाने सुरू करण्याच्या विचाराधीन आहेत. तरी तालुक्यातील सहकारी औद्योगिक वसाहतीसह सर्व भागांतील कारखाने सुरू करण्याबाबत योग्य सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी उद्योजकांनी केली.
“त्या’ अटीवर कारखाने सुरू करणे अशक्य
कारखाने सुरू करण्याची परवानगी देताना सर्व कामगार , अधिकारी व मालक यांना कारखान्यातच रहाणे बंधनकारक केले आहे. ही अट अवलंब करून कारखाने सुरू करणे केवळ अशक्य आहे. तरी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कारखान्यानप्रमाणेच इतर कारखान्यांनाही त्यांचे कामगार, अधिकारी व मालकांना कारखान्यात ये-जा करण्यासाठी कामगार बसशिवाय पुरेसे चारचाकी व दोन चाकी वाहने परवाने देण्यात यावेत, असेही उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले होते.
या आहेत प्रशासनाच्या अटी व शर्ती
कॅन्टोन्मेंटमधील कर्मचारी घेता येणार नाही
30 टक्के कामगारांवर कंपनी सुरू करायची
कंपन्यांमध्ये तुर्तास दुचाकींना परवानगी नाही
शासनानाचे सर्व आदेश पाळून कर्मचाऱ्यांसाठी चारचाकी वाहनांची सोय करण्यात यावी