सुमारे एक महिन्याहून अधिक काळ आपण सर्वजण लॉकडाऊन आहोत. सुरुवातीला इच्छा नसताना आणि नंतर गांभीर्यानेच हा पर्याय सर्वांनी स्वीकारला. आपला देश नैसर्गिक आणि सांस्कृतिक विविधतेने नटलेला आहे. हीच आपली खरी ताकद. एरव्ही प्रांत, भाषा, वर्ग, धर्म, जातीच्या आधारे आपलं अस्तित्व सांभाळत असलो, तरी संकटात आपण नेहमीच हे सारं विसरुन एकतेचं दर्शन घडवलं आहे.
या संकटात जनतेच्या सहकार्याने राज्य व केंद्र सरकारचा करोनाविरुद्धचा लढा जोमाने सुरू आहे. डॉक्टर, परिचारिका, पोलिस, सरकारी अधिकारी मोठया हिंमतीने आपली भूमिका बजावताना आपण पाहातो. त्या सर्वांप्रती कृतज्ञता जपणे आवश्यक आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाल्याने अनेकांना विविध प्रकारचे प्रश्न भेडसावत आहेत. अनेकांना विम्याच्या हप्त्याची चिंता आहे. न भरल्यास आपली पॉलिसी बंद पडेल का? मला विमाहप्ता कसा भरता येईल? असे प्रश्न निर्माण झालेत. वास्तविक या प्रश्नांमुळे कोणीही घाबरुन जाण्याचे कारण नाही.
एलआयसीच्या वेबसाईटवर जाऊन आपणांस विमा हप्ते ऑनलाईन पद्धतीने सहज व सुरक्षित पद्धतीने भरता येतील. कोणीही त्याची भीती बाळगू नये. करोनाच्या महामारीने ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटूंबियांना एलआयसी पॉलीसींच्या माध्यमातून आर्थिक संरक्षण मिळाल्याची अनेक उदाहरणे आहेत. करोनाही लवकरच हद्दपार होईल. धीराने आणि धैर्याने सामोरे जावे लागेल.
अनिता उदावंत, आयुर्विमा सल्लागार, नगर । संपर्क : 9527455352
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्चला जनता कर्फ्यु जाहीर केला आणि सर्वांचीच बोलती बंद झाली. करोनाग्रस्तांची शहरांची आकडेवारी पाहता हे बाहेरच्या देशातून आलेले संकट, अशीच भावना तयार झाली. त्यावर लॉकडाऊन हाच पर्याय. घरातच नजरकैद. त्यातही पहिले दोन चार दिवस काम खूप आहे, सुधारेल परिस्थिती, अशी मनस्थिती तयार झाली. त्यातून घराची स्वच्छता, सामानाची आवराआवर झाली. दरम्यान, वर्तमानपत्रे, टीव्ही, मोबाईलद्वारे जगभरातील संकटाचे थैमान पाहून वाटले, यातून आपला देश आणि आपण वाचणार कसे? त्यातच आपल्या देशाचे लोकसंख्या आणि आपल्या देशातील स्वच्छतेच्या (?) सवयी, पाहता भीती वाटली. स्वच्छतेचे महत्त्व मनाला पटले. आता एवढे दिवस जाणार कसे? काय करायचे घरी बसून?
शिवाय एवढे निवांत बसण्याची सवय नाही. त्यातून विचारचक्र सुरू झाले. लॉकडाऊन शाप की वरदान? यावरही विचार सुरू झाला. सुरुवातीला वाटले काय हरकत आहे. 14 एप्रिलपर्यंत तर आपल्याला सुट्टी म्हणजे वरदानच की. मग कामांची यादी तयार झाली. महत्त्वाची कागदपत्र, बॅंकेचे पासबुक, वेगवेगळ्या पावत्यांची आवराआवर झाली.
एलआयसीचे हप्ते, लाईट बिल, मुलांचे दाखले, इन्कम टॅक्सच्या फाईली, डॉक्टरांचे रिपोर्ट, आदी स्वरुपाची कामे झाली. मित्रांना शेजारच्यांना, नातेवाईकांना वेळ दिला गेला. परिसर स्वच्छतेचे काम झाले. मैत्रीची वीण घट्ट झाली. टीव्ही मोबाईल सोडून मुलांची कॅरम, बॅडमिंटन, लगोरीसारखी खेळांशी पुन्हा मैत्री झाली. मुले पुस्तके वाचण्यात रमली. हा सकारात्मक परिणाम पहायला मिळाला.
एस. एन. शास्त्री, नगर । संपर्क: 9860025251