शासकीय यंत्रणांकडून स्थलांतराचे नियोजन
राजगुरुनगर – रायगड व पुणे जिल्ह्याच्या सीमेवर खेड तालुक्यातील भोरगिरी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील भीमाशंकरजवळील पदरवाडी येथे डोंगर जमिनीला जवळपास 300 मीटर लांब पडलेल्या भेगेमुळे पदरवाडीला भूस्खलनाचा धोका असून येथे येथील वास्तव्यास असणाऱ्या कुंटुबीयांचे स्थलांतराबाबत खेड महसूल, पंचायत समिती, वनविभाग आणि पोलीस यत्रंणेतील पथकाने घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे.
रायगड – पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या उंच कड्याखाली भीमाशंकर जवळ पदरवाडी ही छोटी वाडी आहे. या वाडीत 15 आदिवासी कुटुंबे राहत असून लहान मोठी 80च्या आसपास लोकसंख्या आहे. या वस्तीपासून 100 मीटर अंतरावर डोंगर जमिनीत मोठी भेग पडली आहे. 1 ऑगस्ट रोजी स्थानिक ग्रामस्थांनी व्हॉट्सऍपच्या ग्रुपच्या माध्यमातून या भेगेचे फोटो सोशल मीडिया व स्थानिक प्रशासनाला पाठवल्याने या वाडीची भीती पुढे आली आहे.
या फोटोंची खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी याची दखल घेतली असून तत्काळ घटनास्थळाची पाहणी करण्याचे निर्देश तहसीलदार प्रशांत बेडसे यांना दिले. तहसीलदार बेडसे यांनी विविध शासकीय विभागातील या भागातील नेमणुकीस असणाऱ्या कर्मचारी यांची पथके केली. अप्पर तहसीलदार तथा परीक्षाविधीन उपजिल्हाधिकारी डॉ. नेहा शिंदे यांच्यासह वन विभाग, पोलीस यंत्रणा, तलाठी, ग्रामसेवकासमवेत भीमाशंकर अभयारण्यातून तब्बल चार तास पायी चालत पदरवाडीला बुधवारी (दि. 2) भेट देऊन स्थानिकांशी संवाद साधला.
या भागात सतंतधार पाऊस पडल्यास हा भाग खचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. खालापूर तालुक्यातील ईशाळवाडीची घडलेली दुर्घटना ताजी असताना या घटनेची पुनरावृत्ती होण्याच्या शक्यतेने आदिवासी कुंटुबामध्ये भीतीचे वातावरण असल्याचे पदरवाडी ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना सांगितले. वाडीच्या पासून 100 मीटर अंतरावर पडलेल्या भेगेमुळे महसूल प्रशासनासह सर्व यत्रंणा तत्काळ घटनस्थळी आल्याने ग्रामस्थांना धीर आला असला तरी पावसाळ्यात तात्पुरते स्थलांतर करण्यासाठी प्रशासकीय यत्रंणेने हालचाली सुरु केल्या आहेत. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे.
पदरवाडीच्या स्थलांतर करण्याबाबत सर्व शासकीय यत्रंणातील पथकाने केलेल्या पाहणीतून पंचनामा करुन तसा अहवाल खेड तहसीलदार कार्यालयाकडे तत्काळ सादर केल्याने या पंचनाम्यावरुन प्रशासकीय यंत्रणेने वरिष्ठाकडे अहवाल पाठवला आहे. महसूल यत्रंणेसह सर्व यंत्रणेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी सावधनेतसह खबरदारी घेण्यासाठी या पदरवाडीकडे लक्ष ठेवून आहेत; मात्र पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे तेवढाच कालावधी उपलब्ध असून शासकीय यंत्रणेने विलंब लावण्याऐवजी या परिसरातून पदरवडीतील कुटुंबांना स्थलांतर करण्याचे काम हाती घेणे आवश्यक आहे.
-शारदा बढे, वाडा मडंलाधिकारी
निवारा करणे जिकरीचे
ईर्शाळवाडी जसे उंच कड्याखाली आहे तसेच चित्र पदरवाडीचे आहे. भीमाशंकरमधून हनुमान तळ्याच्या परिसरातून कोकणकड्याच्या उंच कड्यावरुन उतरण्यासाठी 2 किलोमीटरच्या पायी वाटेने पदरवाडीत जाण्यास अडीच-तीन तास लागतात. त्यामुळे या परिसरात पर्यायी जागा उपलब्ध करुन देऊन तंबूत कुटुंबे ठेवणे, निवारा करणे प्रशासनाच्या दृष्टीने जिकरीचे ठरणार आहे. याशिवाय 100 हून अधिक पाळीव जनावरे त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न पुढे आहे. भीमाशंकर अथवा भोरगिरी परिसरातील डोंगरावर येळवली येथे व्यवस्था केली तर दिवसभर जनावरे सांभाळणे आणि शेतीकडे लक्ष देणे शक्य होईल, सायंकाळी निवाराकेंद्रात वास्तव्य करणे शक्य आहे.
तीन ते चार पर्याय
भीमाशंकर परीसरातील महादेव बन परिसरात देवस्थान धर्मशाळा, भक्तिनिवास, जिल्हा परीषद शाळा आंबेगाव तालुक्यात येत असले तरी हे अंतर जवळचे आहे. खेड तालुक्यातील टोकावडे येथे आश्रमशाळेच्या जुन्या इमारतीच्या खोल्या उपलब्ध असल्या तरी हे अंतर पदरवाडीपासून 20 किलोमीटर आहे. यापेक्षा आंबेगाव तालुक्यातील तेरुगंण, राजापूर शासकीय आश्रमशाळांचे अंतर पदरवाडीपासून 8 ते 15 किलोमीटर अंतरावर आहे. पदरवाडीचे पुनर्वसन करण्यासाठी शासकीय गायरान जागा तीन ते पाच किलोमीटर अतंरावर नसल्याने भीमाशंकर अभयारण्य परिसरात पदरवाडीचे पुनर्वसन होणे अवघड असल्याचे समोर आले आहे.