– माधव विद्वांस
सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक अशा क्षेत्रात अग्रेसर असणारे समाजसेवक रामकृष्ण नारायण तथा बन्याबापू गोडबोले यांचा आज स्मृतिदिन. ते भाऊकाका म्हणून ओळखले जायचे. त्यांचा जन्म 6 डिसेंबर 1914 रोजी सातारा येथे झाला. त्यांनी बी.कॉम.नंतर बॅंकिंगची सी.ए.आय.आयबी, सिडनेहॅम कॉलेज, मुंबई येथून पदवी घेतली. विक्रीकर सल्लागार तसेच आयकर सल्लागार म्हणून त्यांची ख्याती होती. सातारा जिल्ह्यातील तत्कालीन कॉंग्रेसमधील ते निष्ठावंत कार्यकर्ते होते. यशवंतराव चव्हाण यांचे ते परमस्नेही होते.
युनाइटेड वेस्टर्न बॅंकेचे 10 वर्षे चेअरमन होते. ही बॅंक नंतर आयडीबीआय बॅंकेत विलीन झाली. तसेच सातारच्या आयुर्वेदिक औषधे उत्पादन करणाऱ्या प्रसिद्ध अर्कशालाचे संस्थापक व चेअरमन होते. त्यांनी 10 वर्षे सातारा नगरपरिषदेचे सदस्य, तसेच 1 वर्ष सातारानगर पालिकेचे अध्यक्षपद भूषविले होते.
समर्थ सेवा मंडळ, श्रीराम देवस्थान चाफळ, वरंधा घाटातील सुंदरमठ सेवा समिती शिवथरघळ, सोमण स्मारक मंदिर अशा असंख्य संस्थांतून नेतृत्व व मार्गदर्शन करून मोठे सामाजिक कार्य केले. पूर्वी सातारा येथून अंतिम संस्कार करण्यासाठी सुमारे 10 किलोमीटर अंतर चालत जावे लागत असे. ही गोष्ट खूपच जिकिरीची असे. त्यावर हा त्रास कमी करण्यासाठी त्यांच्या सहकाऱ्यांसह त्यांनी अंत्यसंस्कार मंडळ स्थापन करून मोठी बस खरेदी केली. त्यामुळे सातारकरांना आपल्या प्रिय व्यक्तीला अखेरचा निरोप देणे सुलभ झाले. सज्जनगड येथे जाण्यासाठी रस्ता तयार करण्यास त्यांनी पाठपुरावा केला होता. वर्ष 1962 मधे सातारा येथे भरलेल्या साहित्य संमेलनाचे ते कार्याध्यक्ष होते. या सगळ्यात त्यांच्या पत्नी मालतीबाई यांची मोलाची साथ होती.
सातारचे श्रद्धास्थान खिंडीतील गणपती देवालयाचा त्यांनी जीर्णोद्धार केला. आज ते सहलीचे आकर्षक ठिकाणही झाले आहे. येथे आयुर्वेदिक वनस्पतींचे उद्यान निर्माण करण्यात आले आहे. रा. ना. गोडबोले विश्वस्त निधी वर्ष 1971 मध्ये स्थापन करण्यात आला. त्यासाठी एक कोटी वीस लक्ष रुपयांचा निधी कुटुंबातर्फे उभारण्यात आला आहे, यासाठी बाहेरून कोठलाही निधी गोळा केला जात नाही. त्यातून आज अनेक गरीब विद्यार्थ्यांना कोणतीही जात धर्म न पाहता धर्मनिरपेक्षपणे आर्थिक मदत दिली जाते. दरवर्षी सुमारे 440 विद्यार्थी व 12 संस्थाना सुमारे साडेपाच लाख रुपयापर्यंत मदत दिली जाते. सातारा भूषण पुरस्कार दरवर्षी स्थानिक कर्तृत्ववान व्यक्तीस देण्यात येतो.
ते अत्यंत शिस्तप्रिय होते. त्यांची दिनचर्या अत्यंत काटेकोर होती. पहाटे लवकर उठून ते अजिंक्यतारा किल्ल्यावर फिरावयास जायचे. संध्याकाळी लवकर जेवण करून लवकर झोपत असत. त्यांचा माझ्याशी एकदाच संबंध आला; पण तो माझ्या आठवणीतील एक सुखद प्रसंग ठरला. त्यावेळी त्यांची एखाद्या गोष्टीवर अनेक बाजूवर सखोल अभ्यास करण्याची पद्धत अनुभवता आली. चिंतामणी हॉस्पिटलबाबत मला त्यांनी एक स्केच काढण्यास सांगितले होते. ते काढताना रुग्णालयात आवश्यक असणाऱ्या सर्व खोल्यांचे वर्णन मला सांगितले आणि तपशीलवार माहिती दिली. 18 नोव्हेंबर 1998 रोजी त्यांचे निधन झाले.