ढाका :- येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात बांगलादेशने भारताचा चार विकेट्स राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 9 विकेट गमावून 102 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशने 18.2 षटकांत 6 बाद 103 धावा करून सामना जिंकला.
तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिला संघाने यापूर्वीचे दोन सामने जिंकले. त्यामुळे आजच्या सामन्यात पराभव जरी झाला असला तरीही भारताने ही मालिका 2-1 अशी जिंकली आहे.
बांगलादेशकडून शमिमा सुलतानाने सर्वाधिक 42 धावा केल्या. बांगलादेशने स्वतःला क्लीन स्वीपपासून वाचवले, पण त्यांना मालिका वाचवता आली नाही. यासह भारताने टी-20 मालिका 2-1 ने जिंकली. टीम इंडियाने पहिला टी-20 सात विकेटने आणि दुसरा टी-20 आठ धावांनी जिंकला. आता 16 जुलैपासून दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे.
तत्पूर्वी, टीम इंडियाने 20 षटकात 9 विकेट गमावून 102 धावा केल्या होत्या. कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्वाधिक 40 धावांची खेळी केली. याशिवाय स्मृती मानधना एक धावा, शेफाली वर्मा 11 धावा, जेमिमा रॉड्रिग्ज 28 धावा, यास्तिका भाटिया 12 धावा, अमनजोत कौर दोन धावा, पूजा वस्त्राकार दोन धावा, दीप्ती शर्मा चार धावा आणि मिन्नू मणी एक धावा काढून बाद झाल्या. बांगलादेशकडून राबेया खानने सर्वाधिक तीन तर त्याचवेळी सुलताना खातूनने दोन विकेट घेतल्या.नाहिदा अख्तर, फहिमा खातून आणि शोर्ना अख्तर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
103 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशच्या संघाकङून शथी राणी 10 धावा, दिलारा अख्तर एक धाव, कर्णधार निगार सुलताना 14 धावा, शोर्ना अख्तर 2 धावा, सुलताना खातून 12 धावा करून बाद झाल्या. मात्र, शमीमा सुलतानाने एका बाजू लावून धरली. तिने 46 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 42 धावांची खेळी केली.तर रितू मोनीने नाबाद 7 आणि नाहिदा अख्तरने नाबाद 10 धावांंची खेळी करून संघास विजय मिळवून दिला.
भारताकडून गोलंदाजीत मिन्नू मणी आणि देविका वैद्य यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. त्याचवेळी जेमिमा रॉड्रिग्जला एक विकेट मिळाली.