मुंबई – मनसे अध्यक्ष्य राज ठाकरे सध्या दोन दिवस कोकण दौऱ्यावर आहेत. आज ते चिपळूणमध्ये आहेत. त्यानंतर ते खेड आणि दापोलीला भेट देणार आहेत. या कोकण दौऱ्यात ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.आगामी मुंबई महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीचे सत्र सुरू केले आहे. आज सकाळी त्यांनी चिपळूण येथे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी राज ठाकरेंनी अनेक महत्वाच्या मुद्यांवर भाष्य केलं आहे.
पक्षातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरेंनी सद्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले. “राज्यात जो राजकीय व्याभिचार सुरु आहे तो मी करणार नाही. मला तडजोड करावी लागली तर मी घरात बसेन पण तडजोड करणार नाही…’ असे राज यांनी महाराष्ट्र सैनिकांच्या मेळाव्यात म्हटले.
यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, लवकरच मेळावा घेणार आहे. तेव्हा बोलू. मात्र, आता संघटनात्मक बांधणीसाठी आलो आहे. या नंतर राज- उद्धव एकत्र येणार का? या प्रश्नावर राज ठाकरेंनी मिश्किल हास्य करत उत्तर देणे टाळले. त्यामुळे त्यांच्या हास्यातून नेमका काय अर्थ काढायचा असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता एकत्र यावे, अशी मागणी शिवसैनिक आणि मनसैनिक करू लागले आहेत. या मागणीबाबतचे फलकही त्यांच्याकडून ठिकठिकाणी लावले जात आहे. तर, सोशल मीडियावर देखील अनेक पोस्ट व्हायरल करण्यात केल्या जात आहेत.