श्रीगोंदा – तालुक्याच्या काही ठराविक भागात पाऊस झाला असला तरी बहुतांश भाग अद्याप पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पाऊस झालेल्या आणि न झालेल्या दोन्ही भागात आठवडाभरात पाऊस होण्याच्या अपेक्षेवर शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली आहे. तालुक्यात पावणेनऊ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
मृग नक्षत्रात पावसाने हुलकावणी दिल्यानंतरही जिल्ह्यातील 60 टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी, उडीद, मूग, मका या सारख्या पिकांची पेरणी केलेले शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. तालुक्यातील घोड, कुकडी पट्ट्यातील ठराविक भागात पडलेल्या पावसाने पेरणी झालेल्या पिकांना मात्र संजीवनी दिल्याचे चित्र आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात तालुक्यातील काही भागात चांगला पाऊस झाला. परंतु, मध्यंतरी पावसाची उसंत टेन्शन देणारीच ठरली. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पेरण्या करत असताना थोडा हात आखडता घेतला होता. मागील आठवड्यापासून श्रीगोंदा शहरास तालुक्यातील काही भागात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्याने वातावरणातील उकाडा कमी झाल्याचे दिसून येत आहे. यंदा सरासरी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे यंदा बऱ्यापैकी पाऊस पडेल, असा अंदाज बांधून शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या लागवडीला सुरूवात होऊन शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग दिसून आली. मात्र, पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
तालुक्यात झालेल्या पेरणीची आकडेवारी
बाजरी 2497 हेक्टर, मका 1640 हेक्टर, तूर 1097 हेक्टर, मूग 548 हेक्टर, उडीद 606 हेक्टर, सोयाबीन 147 हेक्टर, कापूस 2181 हेक्टर अशी एकूण 8845 हेक्टर म्हणजे साधारणत: 34 टक्के पेरण्या आटोपल्याचे आकडेवारी कृषी विभागाकडे उपलब्ध आहे.