स्वतःची काळजी घेत कर्मचारी देत आहेत सेवा; टिकाटिपण्णीकडे दूर्लक्ष
प्रशासनाकडूनही बॅंक कर्मचाऱ्याना उत्तम साथ
पुणे : सध्या देशभरात लॉक डाऊन चालू असल्यामुळे सर्वसामान्य लोकांचे जीवन सुरळीत चालविण्यासाठी काही सेवा जोखीम घेऊन अखंडपणे चालू ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये वैद्यकीय सेवा, सफाई, जीवनावश्यक वस्तू पुरवठा आणि बॅंकिंग सेवांचा समावेश आहे.
या प्रदीर्घ कालखंडामध्ये पुण्यातील सरकारी, खासगी आणि सहकारी बॅंकांनी आपल्या ग्राहकांना अखंड सेवा दिली आहे. इतर क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या कामाचे उदात्तीकरण केले जात असले तरी बॅंकिंग क्षेत्राच्या सेवांची स्तूती करण्यात मात्र हात आखडता घेतला जात असल्याची परिस्थिती आहे.
बॅंकांचे कर्मचारी आपल्या परिवारापासून दूर होत आपल्या शाखांमध्ये नियमितपणे येत आहेत. आतापर्यंत तरी सर्व सेवा नियमित आणि अखंडपणे चालू असल्या तरी एखादा अपवादात्मक प्रकार घडल्यानंतर बॅंकिंग सेवा वर टीका होण्याचे प्रकार घडून येत आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून हे कर्मचारी आपली सेवा अखंडपणे देत आहेत.
पासबुक अपडेट करताना किंवा नोटा धनादेश स्वीकारताना किंवा आरटीजीएससारखे भरलेले फॉर्म स्वीकारताना करोना व्हायरसच्या संक्रमणाचा धोका असतो. कर्मचारी यासाठी आवश्यक ती काळजी घेऊन ग्राहकांना सेवा देत आहेत. त्याचबरोबर त्रासलेल्या ग्राहकाला धीर देण्याचे काम काही कर्मचारी करीत आहेत. बॅंकाच्या शाखात गेल्यानंतर सुरुवातीला तेथील सुरक्षारक्षक ग्राहकाला हॅंड सॅनीटायझर देऊन त्याचे स्वागत करतात.
त्यानंतर बॅंकांनी दोन ग्राहकात एक मीटर आंतर राहील याची खबरदारी घेतली आहे. ग्राहकांचा आणि कर्मचाऱ्यांचा थेट संबंध येणार नाही यासाठी काळजी घेण्यात येत आहे. बॅंकांच्या व्यवस्थापनांनी बॅंक कर्मचाऱ्यांना कशाप्रकारे सेवा द्यावी आणि स्वतःला सुरक्षित ठेवावे या संदर्भात मार्गदर्शन केले आहे. मात्र अशा परिस्थितीतही ग्राहकांना सेवा देत असूनही काही ग्राहक मात्र बॅंक कर्मचाऱ्यांचे आरामाचे असते अशी नकारात्मक टिप्पणी करतात.
लॉक डाऊनच्या काळात केंद्र सरकारने गरीब महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला पाचशे रुपये देण्याची घोषणा केली आहे. या महिलांच्या खात्यामध्ये ही रक्कम टाकण्यात आली. या गरीब महिलांना सुरक्षित अंतर ठेवून हाताळणे अवघड असूनही ही मोठी जबाबदारी बहुतांशी बॅंकांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
बॅंकांच्या प्रशासनानेही कर्मचाऱ्यासाठी आणि बिझनेस करस्पॉंडंटसाठी काही विमा योजना आणि सानुग्रह रकमेची घोषणा केली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना थोडाफार मानसिक आधार मिळाला आहे. अगोदर नोटाबंदी नंतरही टीका सहन करत बॅंक कर्मचाऱ्यांनी बरेच महिने यशस्वीरीत्या काम करून भारतीय अर्थव्यवस्थेला रुळावर आणले होते.
आताही बॅंक कर्मचारी जोखीम घेत असे सेवा देत अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी मोलाचे योगदान करीत आहेत. बॅंकांचे बरेच ग्राहक समजदार असतात. ते स्वतः संसर्ग होणार नाही याची काळजी घेत काम करण्याचा प्रयत्न करतात. मात्र काही ग्राहकांना समजावून सांगणे आणि आवरणे अवघड असते. अशावळी आवाजाची थोडी चढ-उतार होते. आतापर्यंत तरी पुण्यातील बॅंकांनी ग्राहकांना उत्तम सेवा दिली आहे. आणि बॅंका यासाठी अभिनंदनास पात्र आहेत असे काही कृतज्ञ ग्राहक म्हणतात.