मुंबई – जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ अशी सार्थ ओळख असलेल्या बीसीसीआयने आता येत्या काळात करोनाचा धोका संपुष्टात आल्यावर मालिकांचा धडाका सुरु करणार असल्याचे जाहीर केले आहे.
करोनामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट थांबलेले असल्याने येत्या काळात सर्व देशांना नियोजित मालिका लवकरात लवकर खेळवाव्या लागणार आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका करोनाच्या संकटामुळे रद्द झाल्यानंतर एकही मालिका खेळविण्यासारखी परिस्थिती राहिली नाही. आता हा धोका जेव्हा संपुष्टात येईल त्यावेळी जगातील अन्य देशांपेक्षाही जास्त भारतीय संघ व्यस्त होणार आहे. आयपीएल अनिश्चित कालावधीसाठी स्थगित केल्यामुळे बीसीसीआयला जवळपास 4 हजार कोटी रुपयांचा तोटा होणार आहे. ही स्पर्धा खेळविली गेली तरच हे नुकसान भरुन निघणार आहे.
मात्र, सध्यातरी याबाबत काहीही संकेत देण्यात आलेले नाहीत. भारतासह इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका या क्रिकेट मंडळांना करोनाचा सर्वात मोठा फटका बसलेला आहे. यातून बाहेर येण्यासाठी बीसीसीआयने एक आराखडा तयार केला आहे. त्यानुसार सर्व काही घडले तर बीसीसीआयसह सर्वच देशांना लाभ होणार आहे. आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयचे प्रतिनिधी म्हणून सचिव जय शहा उपस्थित होते व त्यांनीच आगामी काळातील आराखडा कसा असेल हे स्पष्ट केले असून त्यांच्या सूचनांना सगळ्या संलग्न देशांनी समर्थन दिले आहे.
2023 ते 2031 या कालावधीत कसे वेळापत्रक असावे याचीही माहिती त्यांनी दिली. भविष्यात अन्य देशांनाही लाभ व्हावा यासाठी भारतीय संघ सातत्याने मालिका खेळणार आहे. त्यात श्रीलंकेविरुद्ध 3 एकदिवसीय व 3 टी-20 सामन्यांची मालिका, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 कसोटी सामन्यांची मालिका, झिम्बाब्वेविरुद्ध टी-20 मालिका तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळविण्यात येणार आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर या मालिका घेण्याचा हा प्रस्ताव आहे.