नवी दिल्ली – सरकारी बॅंकांच्या खासगीकरणाचा विरुद्ध बॅंक कर्मचाऱ्यांनी राजधानी दिल्लीसह इतर राज्यांच्या राजधानीत आज निदर्शने केली सरकारने. जर आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर मार्च महिन्यामध्ये कर्मचारी संसदेवर मोर्चा काढणार आहेत.
ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशन या संघटनेने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, विविध बॅंकांच्या संघटनातील दहा लाख कर्मचाऱ्यांनी निदर्शनात भाग घेतला. पुढील पंधरा दिवसात हे कर्मचारी देशाच्या विविध भागात निदर्शने करणार आहेत.
10 मार्च रोजी संसदेवर मोर्चा काढण्यात येईल. तरीही सरकारने दुर्लक्ष केले तर 15 आणि 16 मार्च रोजी बॅंक कर्मचारी संप करतील. त्यानंतर प्रदीर्घ आंदोलन करण्याची शक्यता खुली ठेवण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
स्वातंत्र्यानंतरच्या आर्थिक प्रगतीत सरकारी बॅंकांचा मोठा वाटा असूनही सरकार या बॅंकांचे खासगीकरण करीत आहे. सध्या सरकारी बॅंका अतिशय उत्तम काम करीत आहेत. मात्र अनुत्पादक मालमत्ता वाढली आहे. कारण मोठ्या कंपन्यांनी कर्ज घेऊन ते परत केलेले नाही. या मोठ्या कंपन्यांवर दबाव आणण्याऐवजी सरकार बॅंकांचे खासगीकरण करीत आहे, असे या संघटनेच सरचिटणीस सी एच व्यंकटचलम यांनी सांगितले.