मुंबई – गणेशोत्सवात विसर्जनावेळी समुद्रावर प्रचंड गर्दी जमते. त्यामुळे करोनाचा संसर्ग होण्याचा धोका असल्याने यंदा गणेशमुर्तींचे समुद्रात विसर्जन करण्यावर बंदी घाला, अशी मागणी शहरातील अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
घरगुती असो वा सार्वजनिक गणशोत्सव मंडळांच्या मुर्तींचे दरवर्षी समुद्रात विसर्जन केले जाते. याबाबत पर्यावरण विभागानेही अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. समुद्राच्या पाण्यात विसर्जन केल्यामुळे पर्यावरणाची हानी होत असल्याच्या तक्रारीही अनेकदा केल्या गेल्या आहेत. मात्र, सध्याची परिस्थिती भिन्न आहे.
जगभरात करोनाचा धोका अद्याप कायम आहे. विसर्जनाच्या वेळी मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर प्रचंड गर्दी होते. त्यातील काही व्यक्तींना जर करोनाची बाधा झालेली असेल तर त्याचा मोठा फैलाव होण्याचा धोका आहे. यामुळे परिस्थिती आणखी बिकट होईल, असेही या निवेदनात नमुद केले आहे.
गेल्या वर्षी मुंबईत समुद्रात जवळपास 3 लाख गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले होते. ही आकडेवारी पाहता समुद्रावर विसर्जनासाठी गर्दी होणार व त्यामुळे करोनाचा पुन्हा उद्रेक होऊ शकेल. हा धोका लक्षात घेऊन समुद्रात गणेश मुर्तींच्या विसर्जनावर बंदी घालण्यात यावी, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे.
कृत्रिम तलावांची संख्या वाढवा
मुंबई महापालिकेने गणेशमुर्तींच्या विसर्जनासाठी 400 ते 500 कृत्रिम तलाव उपलब्ध करून द्यावेत. करोनाला अटकाव करायचा असेल तर सुरक्षेची व जनतेच्या आरोग्याची काळजीम्हणून या गोष्टींची सुविधा निर्माण केली जावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.