पुणे: राज्यातील विधानसभा निवडणुकीचे मतदान आज पार पडत आहे. हि मतदान प्रक्रिया पार पडत असताना राज्यात अनेक ठिकाणी याला गालबोट लागळे असल्याचा घटना समोर आल्या आहेत. नांदेड मधील देगलूर, अंतापुर चैनपुर, सोलापूर मधील करमाळा आणि जालना मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांवर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.
नांदेड जिल्ह्यातील देगलुर विधानसभा मतदारसंघातील वंचितच उमेदवार प्रा.रामचंद्र भरांडे यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. त्यांच्या गाडीच्या काचा फोडून नासधूस करण्यात आली आहे. भरांडे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा मतदारसंघात वंचितचे उमेदवार अतुल खूपसे पाटील यांच्या पत्नी आणि पोलिंग एजंट यांच्यावर आज सकाळी हल्ला केला गेला. यात खूपसे पाटील यांच्या पत्नीच्या हाताला तर २ कार्यकर्त्यांना डोक्याला जबर मार लागला असून ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. तसेच जालना शहरातील वंचितचे उमेदवार अशोक खरात यांच्यावर आज सकाळी हल्ला झाला आहे. यात एक कार्यकर्ता जबर जखमी झाला असून जालना येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान ‘वंचित बहुजन आघाडीने आता पर्यंत सुरू असलेल्या घराणेशाहीला फाटा दिला आणि ज्यांना कधी ह्या लोकशाही व्यवस्थेत स्थान मिळत नाही अशा वंचित समूहातील व्यक्तींना उमेदवारी दिली. प्रस्थापित घराणेशाहीमधील उमेदवारांनी याचा धसका घेतला म्हणून त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारावर हल्ले करायला सुरुवात केली आहे’, असं वंचित बहुजन आघाडीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवलं आहे.
हे ही वाचा
मुंबई, पुणे, अमरावतीत मतदानप्रक्रियेला गालबोट; शिवसेनेच्या शाखेची तोडफोड