संतोष पवार
सातारा – राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यात अजित पवार यांनी समर्थकांसह शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवार व अजित पवार असे दोन गट पडले आहेत. जिल्ह्यातील दिग्गज नेते विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतल्याने जिल्हा राष्ट्रवादीला भगदाड पडले आहे. शरद पवार यांच्या शिलेदारांची बालेकिल्ल्यात अस्तित्व टिकवण्यासाठी दमछाक होताना दिसत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, खा. सुप्रिया सुळे यांनी जिल्ह्यावर नेहमीच भरभरुन प्रेम केले आहे.
जिल्ह्यात राष्ट्रवादीचे चांगले वातावरण होते. मात्र पक्षांतर्गत धुसफूस कायम राहिली आहे. अडवाआडवी, जिरवाजिरवीच्या राजकारणामुळे राष्ट्रवादीत काही प्रमाणात असंतोष होता. जिल्हा बॅंक निवडणुकीत त्याची प्रचिती आली. अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. त्याचे कारण शोधले असता जिल्ह्यात पहिल्यापासून अप्रत्यक्षरित्या शरद पवार व अजित पवार यांचे स्वतंत्र गट कार्यरत असल्याचे दिसून येते. पक्षांतर्गत संघर्ष वाढल्याने त्याचे स्वरुप स्पष्ट झाले आणि बालेकिल्ला धोक्यात आला. या घडामोडींनंतर जिल्हा राष्ट्रवादीतही अपेक्षेपेक्षा जास्त गटबाजी दिसली. रामराजे, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण यांनी अजित पवार यांना साथ दिली. तीन दिग्गज गळाला लागल्याने खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे या तिघांवरच बालेकिल्ला वाचवण्याची जबाबदारी आली. रामराजे नाईक निंबाळकर यांनी एकप्रकारे जिल्ह्यात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
जिल्हा बॅंकेवरील रामराजे यांचीच मजबूत पकड आहे. फलटण- कोरेगाव मतदारसंघही त्यांनी ताब्यात ठेवला आहे. मतदारसंघातील सहकारी संस्थांवर त्यांचेच अधिराज्य आहे. वाई मतदारसंघात मकरंद पाटील यांचे वर्चस्व असून किसन वीर सहकारी साखर कारखाना, खंडाळा कारखाना व सहकारी संस्थांवर त्यांची मजबूत पकड आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय कबुले, शशिकांत पिसाळ, प्रमोद शिंदे आदी दिग्गज नेत्यांची फौज मकरंद पाटील यांच्याकडे आहे.
त्यामुळे फलटण व वाई मतदारसंघावर एकप्रकारे अजित पवार यांचे पूर्ण वर्चस्व असल्याचे बोलले जात आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात खा. श्रीनिवास पाटील यांचे काम निश्चितच चांगले आहे. मात्र, आगामी निवडणूक ते लढवणार की अन्य उमेदवार दिला जाणार असे अनेक प्रश्न असल्याने कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल आहे. कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांची सह्याद्री साखर कारखान्यासह अन्य संस्थांवर मजबूत पकड असली तरी बाळासाहेब पाटील यांना भाजपने सर्व बाजूने घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मतदारसंघ वगळता त्यांना बाहेर जास्त लक्ष देण्यास वेळ मिळेल अशी परिस्थिती नाही. कोरेगाव मतदारसंघात तर शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांची पुरती दमछाक केली आहे. महेश शिंदे यांनी गावोगावी केलेली विकासकामे हीच त्यांच्या विजयाची नांदी ठरणार असल्याच्या प्रतिक्रिया आहेत.
थेट मुख्यमंत्र्यांकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणण्यात महेश शिंदे यांना यश आले आहे. काही ठिकाणी तर त्यांनी स्वखर्चाने विकासकामे मार्गी लावली आहेत. प्रशासनावर मजबूत पकड ठेवत आ. महेश शिंदे यांनी मतदारसंघाचा कायापालट करण्याचा विडा उचलला आहे. दुसरीकडे शशिकांत शिंदे यांनीही पक्षाची बांधणी करण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधात असल्याने निधी मिळण्यात अडचणी येत असल्याने विकासकामांना काही अंशी ब्रेक मिळाला आहे. मतदारसंघात राष्ट्रवादीची परिस्थिती बिकट असतानाही शशिकांत शिंदे कोरेगाव सोडून साताऱ्यात जनता दरबार घेत असल्याबद्दल नाराजी आहे. “शिंदे साहेब’ आधी मतदारसंघ बघा, असे म्हणण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली आहे.
कोरेगाव मतदारसंघ महेश शिंदेंसाठी “सेफ’
कोरेगाव मतदारसंघात आ. महेश शिंदे यांचा झंझावात सुरु असल्याने आधीच आ. शशिकांत शिंदे यांची दमछाक झाली होती. आता तर राष्ट्रवादीत बंडाळी झाल्याने शशिकांत शिंदे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अजित पवार यांचा जरंडेश्वर कारखाना याच मतदारसंघात असल्याने अजित पवार आपला स्वतंत्र गट तयार करु शकतात. असे झाले तर हा मतदारसंघ महेश शिंदेंसाठी सेफ झोन ठरणार आहे.