सातारा -खासदार उदयनराजे भोसले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील राजकीय वितुष्ट सर्वश्रुत आहे. मात्र, राजकारणात कोणतीही परिस्थिती कायमस्वरूपी नसते. अजित पवार हे शिंदे-भाजप सरकारमध्ये सहभागी झाल्याने राजकीय गणिते बदलली आहेत. अजित पवार यांना अभिनंदनाचा फोन केल्याचे सांगून, उदयनराजेंनी पत्रकारांना आश्चर्याचा धक्का दिला. कास धरणाच्या जलवाहिनीच्या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. पॉवर हाऊस येथे आणि एक मेगावॅट क्षमतेचे वीजनिर्मिती केंद्र पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्याचेही भूमिपूजन उदयनराजेंच्या हस्ते झाले.
उदयनराजेंनी शुक्रवारी कास तलावाची पाहणी केली आणि सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नवीन जलवाहिनीच्या कामाचा शुभारंभ केला. यावेळी माजी नगरसेवक, पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. उदयनराजे यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले असून, ते उपमुख्यमंत्री झाले आहेत. तुम्ही अजितदादांना शुभेच्छा दिल्या का, असे पत्रकारांनी विचारल्यावर, उदयनराजेंनी त्यांना फोनवरुन शुभेच्छा दिल्याचे सांगितले.
सध्या त्यांची धावपळ सुरू आहे. सर्व विषय मार्गी लावल्यानंतर आपण भेटू आणि चर्चा करू, असे अजितदादांनी सांगितले आहे. त्यानुसार मी त्यांची भेट घेऊन प्रत्यक्ष शुभेच्छा देणार आहे. युती सरकारमध्ये अजितदादा सहभागी झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. उदयनराजे आणि अजितदादा यांच्यातील राजकीय मतभेद सर्वश्रुत असताना, ते एकाच सरकारमध्ये आल्याने त्यांच्यात राजकीय सुसंवाद सुरू झाल्याचे दिसत आहे. अजितदादांची भेट घेऊन उदयनराजे भोसले त्यांच्याशी काय चर्चा करणार, याची उत्सुकता पत्रकारांबरोबरच राजकीय वर्तुळातही आहे.
उदयनराजेंच्या हस्ते साताऱ्यात 107 कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. कास धरणाची उंची वाढवण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. हे काम दर्जेदार झाल्याची प्रतिक्रिया उदयनराजे यांनी दिली. कास धरणापासून साताऱ्यापर्यंत 29 किलोमीटर लांबीची नवी जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. सातारकरांना पुरेशा दाबाने आणि मुबलक पाणी येत्या काही वर्षांत मिळेल, असे ते म्हणाले. एक मेगावॅट वीजनिर्मिती केंद्राचे भूमिपूजनही उदयनराजे यांच्या हस्ते झाले. पॉवर हाऊस येथे दहा लाख लिटरची पाण्याची टाकी, सांबरवाडी येथे 16 एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र, अशा कामांचे भूमिपूजन करण्यात आले.