पुणे – मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. ते 77 वर्षांचे होते. मावळ तालुक्यात आंबी या गावी एका फ्लॅटमध्ये ते मृतावस्थेत आढळले. फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याने लोकांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता ते मृतावस्थेत आढळले. दोन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे.
महाजनी यांचे कुंटुंब मुंबईत राहायला असून ते एकटे पुण्यात राहत होते. रवींद्र महाजनी यांची निधनाची माहिती मुलगा अभिनेता गश्मीर महाजनीला कळविण्यात आली आहे. शवविच्छेदनानंतर महाजनी यांचा मृतदेह कुटुंबाकडे सोपविण्यात येणार आहे. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.
रवींद्र महाजनींचा जीवनप्रवास –
रवींद्र महाजनी यांचा जन्म बेळगावमध्ये झाला. त्यांचे वडील ह. रा महाजनी हे स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार होते. त्यांच्या निधनानंतर रवींद्र महाजनी यांच्यावर घराची जबाबदारी आली. पण त्यांनी टॅक्सी चालविण्याचा निर्णय घेतला त्यावेळी मात्र संपादकाचा मुलगा टॅक्सी चालवतो अशी त्यांच्यावर टीका झाली. यामुळे नातेवाईकांनी त्यांच्याशी संबंध तोडले होते.
मुंबईत टॅक्सी चालवून रवींद्र महाजनी अभिनय क्षेत्रात आले होते. मधुसुदन कालेलकर यांच्या ‘जाणता अजाणता’ या नाटकातून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. या नाटकातील त्यांचा अभिनय पाहून शांताराम बापूंंनी त्यांना चित्रपटात संधी दिली. व्ही शांताराम यांच्या झुंज चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. रवींद्र महाजनींनी 1975 ते 1990 चा काळ गाजवला होता. देखण, गोंधळात गोंधळ, रुबाबदार, काय राव तुम्ही यासारखे त्यांचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले.