-प्रा. डॉ. बजरंग कोरडे
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक, बौद्धिक, शैक्षणिक, सामाजिक, समतामूलक, राजकीय व तत्सम कार्याच्या झंझावातामुळे संपूर्ण भारत देशात व आता संपूर्ण जगातही पुरोगामी विचारांचे कोट्यवधी कार्यकर्ते, नेते, अनुयायी तयार झालेले होते आणि आजही आहेत तसेच भविष्यातही तयार होतील. जे जे लोक डॉ. आंबेडकरांच्या विचारांच्या व कार्याच्या प्रकाशझोतात आले तसेच सहभागी झाले त्यांचे जीवन व कर्तृत्व लखलखीत उजळून निघाले.
आंबेडकरी विचारांच्या अनुयायांनी त्यांच्या त्यांच्या परीने अविस्मरणीय व लक्षणीय असे सामाजिक, विधायक व मूलभूत कार्यकर्तृत्व गाजविले आहे. असेच एक निष्ठावान, आंबेडकरी विचारांचे असलेले व प्रत्यक्ष डॉ. आंबेडकरांच्या बरोबर कार्य केलेले एक शिलेदार पुणे जिल्ह्यातल्या पूर्वीच्या भोर संस्थानात व आताच्या भोर तालुक्यात होऊन गेले. ते म्हणजे खासदार राघोबा उपाख्य बाळासाहेब दगडूजी साळुंके.
त्यांचा जन्म 10 सप्टेंबर 1920 रोजी भोर तालुक्यातील म्हसर खुर्द येथे झाला. वयाच्या केवळ 12व्या वर्षीच त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर या क्रांतीसूर्याचे दर्शन घडले. 1932 साली पुणे जिल्ह्यातील तत्कालीन सर्व अस्पृश्य जमातीतर्फे अहिल्याश्रम येथे डॉ. आंबेडकरांना मानपत्र अर्पण करण्याचा समारंभ घेतला गेला. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची बाळासाहेबांना संधी मिळाली.
1934 साली भोर संस्थान दलित परिषदेचे दुसरे अधिवेशन डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या अधिवेशनालाही बाळासाहेबांची उपस्थिती होती. तेव्हापासून पुढे ते बाबासाहेबांच्या महानिर्वाणापर्यंत त्यांच्या वैचारिकतेचा, बुद्धिमत्तेचा व कर्तृत्वाचा महामेरू असलेल्या दीपस्तंभाच्या प्रकाशात बाळासाहेब साळुंके यांचे व्यक्तिमत्त्व बहराला आले. 1937 साली त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुण्यातील गंजपेठ येथे सेनापती बापट यांच्या अध्यक्षतेखाली दलित विद्यार्थी सभेच्या कार्यक्रमाचे आयोजन केले.
1938 साली गंजपेठेत कामगारांसाठी मोफत रात्रशाळा सुरू केली. 1939 साली पुणे येथे भोर संस्थान अस्पृश्य हितसंरक्षक मंडळाची स्थापना केली. भोर संस्थानात राजकीय अधिकार हक्क व मताधिकार व्यापक करावा यासाठी डॉ. आंबेडकर, ऍड. आर. आर. भोळे यांच्या शिष्टमंडळाने भोर संस्थानचे तेव्हाचे राजेसाहेब यांची जी भेट घेतली त्या शिष्टमंडळात बाळासाहेब सहभागी झालेले होते. त्याच दरम्यान त्यांनी भोर संस्थान विद्यार्थी संघटनेची स्थापना केली. पुणे येथे म्युनिसिपल कामगार युनियनची स्थापना केली. 1940 साली पुणे येथील खडकीच्या ऑर्डनन्स फॅक्टरीत कामगार युनियनची स्थापना केली.
1946 साली बाळासाहेब यांची भोर संस्थानचे शिक्षणमंत्री व आरोग्यमंत्री म्हणून भोरच्या संस्थानिक राजांनी नेमणूक केली. 1957 साली लोकसभेच्या निवडणुकीसाठी डॉ. आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशन व संयुक्त महाराष्ट्र समिती या पक्षाच्या उमेदवारीवर बाळासाहेब पुणे जिल्ह्यातील खेड मतदारसंघातून निवडून आले. त्यावेळी शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे नऊ उमेदवार विजयी झाले होते. 1957 साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाल्यावर त्यांनी विविध पदे भूषविली. धडाकेबाज काम सुरू असतानाच 10 सप्टेंबर 1961 रोजी वयाच्या केवळ 41व्या वर्षी त्यांचे निधन झाले.