काश्मीर प्रश्न अद्याप जैसे थे ,पाक पंतप्रधान महंमद अलींचे निवेदन
कराची, ता. 9 : दिल्लीहून ता. 30-8-53 रोजी काढलेल्या पंतप्रधानाच्या संयुक्त पत्रकानंतर काश्मीरप्रश्नाबाबत परिस्थिती बिघडली नाही किंवा सुधारली नाही असे पाक पंतप्रधान महंमद अली यांनी आज पत्रकारांना निवेदन केले.
निमित्झचा राजीनामा अलींनी कानावर हात ठेवले
यूनोचे काश्मीर सार्वमत प्रशासक निमित्झ यांचे राजीनाम्यासंबंधी पाक सरकारकडे काहीच माहिती कळविण्यांत आलेली नाही, असे सांगून अली म्हणाले- राष्ट्रसंघ वा निमित्झ यांनीं आम्हांस काहीच कळविलें नाही.
अलींची उडवाउडवी
काश्मीरप्रकरणी पत्रकारांनी खोदून विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा अली म्हणाले, पत्रकार बैठक म्हणजे काही चौकशी कोर्ट नव्हे. काश्मीर प्रकरणास तूर्त बगल देण्याचा त्यांचा मानस स्पष्ट होता. दिल्ली कराराची कदर राखण्याची भारत-पाक पत्रांनी दक्षता बाळगली नाही याचा अलींनी खेद व्यक्त केला. पाक पत्रांना त्यांनी या कराराची कदर करण्याचा सल्ला दिला.
कोरिया राजकीय परिषदेत भारताला विरोध का केला?
कोरियांत शांततेची इच्छा असूनही कोरिया राजकीय परिषदेतील भारताच्या भागीदारीस विरोध का केला याचे विवरण करतांना ते म्हणाले- शांतताभंग करण्यासारखे काही करू नये-एखाद्या राष्ट्राची नको असणारी भागीदारी लादणे इष्ट नाही म्हणून आम्ही विरोध केला.
बेकारीची भीषण समस्या
सरकारची झोपमोड!
नवी दिल्ली- राजधानी दिल्ली येथे बेकारीच्या भीषण संकटाला कसे तोंड द्यायचे याचा आजकाल अहोरात्र खल चालू आहे.
गेल्या उन्हाळ्यात सरकार एकदम झोपेतून दचकून जागे झाले, आणि डोळे चोळून पाहतो तो बेकारीच्या राक्षसाची अक्राळविक्राळ आकृती समोर उभी होती. गेल्या मे महिन्यात देशातील 126 एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजच्या कचेऱ्यांतील चालू नोंदणी बुकांत सुमारे 4,66,288 अर्जदाऱ्यांची नोकऱ्यासाठी नोंद झाली होती असे आढळले. 1952च्या मे महिन्यात हा आकडा 3,66,595 इतका होता. म्हणजे यंदा बेकारीची संख्या 99,633 इतकी वाढली.